उल्हासनगर, दि. ४ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरातील कॅम्प – ४ परिसरातील नेताजी चौक ते व्हीनस चौकदरम्यान असलेल्या सात मजली आशालोक को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड या निवासी इमारतीला मंगळवारी पहाटे साडेतीन ते चारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत इमारतीच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या आठ दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या. तसेच वीज मीटर, विद्युत वायरिंग आणि पार्किंगमधील विद्युत उपकरणांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

आगीची माहिती मिळताच उल्हासनगर महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ग्राउंड फ्लोअरवरील मीटर बॉक्समध्ये लागलेल्या आगीने काही क्षणांतच विक्राळ रूप धारण केले. त्यामुळे संपूर्ण इमारतीत दाट धुराचे साम्राज्य पसरले आणि रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सात मजली या इमारतीत एकूण ४९ फ्लॅट धारक वास्तव्यास असून धुरामुळे अनेक नागरिक वरच्या मजल्यांवर अडकून पडले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून शिड्यांच्या साहाय्याने तसेच काही नागरिकांना खांद्यावर उचलून सुरक्षित बाहेर काढले. जवानांच्या या धाडसी आणि तत्पर बचावकार्याचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले.

कठोर प्रयत्नांनंतर अग्निशमन विभागाने आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. मात्र या आगीत पार्किंगमधील आठ दुचाकी जळून खाक झाल्या. तसेच सर्व वीज मीटर, अंतर्गत विद्युत वायरिंग आणि इतर विद्युत उपकरणांचे मोठे नुकसान झाले. सुरक्षिततेच्या दृष्टीने संपूर्ण इमारतीचा वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे लिफ्ट सेवा बंद असून पाण्याच्या मोटारीही कार्यरत नसल्याने रहिवाशांना दैनंदिन गरजांसाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. घटनेची माहिती मिळताच उपमहापौर अमर लुंड यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रभावित रहिवाशांची विचारपूस केली. त्यांनी बचावकार्याचा आढावा घेत अग्निशमन विभागाच्या अधिकारी व जवानांच्या धाडसाचे आणि तत्परतेचे कौतुक केले. “अग्निशमन जवानांच्या वेळेवर केलेल्या कारवाईमुळे मोठी जीवितहानी टळली. त्यांनी अतिशय शौर्याने सर्व नागरिकांची सुखरूप सुटका केली,” असे त्यांनी सांगितले.

उपमहापौर अमर लुंड यांनी पुढे सांगितले की, प्राथमिक माहितीनुसार इमारतीच्या अंतर्गत विद्युत यंत्रणेत शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचा अंदाज आहे. आगीमुळे सर्व सब-मीटर जळून गेले असून आगीने दुसऱ्या मजल्यापर्यंत धडक दिली होती. एमएसईबीच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तात्पुरत्या स्वरूपात एक वीज मीटर उपलब्ध करून देण्यात आला असून अत्यावश्यक वीज सेवा पूर्ववत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. तसेच ज्या वाहनांचे नुकसान झाले आहे, त्या वाहनधारकांना विमा दाव्याचा लाभ मिळावा यासाठी पोलिसांकडून पंचनामा करण्यात येत असून संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. दरम्यान, आगीच्या नेमक्या कारणाचा शोध घेण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून तपास सुरू असून प्राथमिक तपासात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.





























