उल्हासनगर दि. १२ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरातील भरतनगर येथील रेल्वे ट्रॅक जवळ नाल्याच्या प्रवाहात पूर्णपणे माती टाकून तो प्रवाह बंद करण्यात आले आहे. पाण्याचा प्रवाह जाण्यासाठी एक छोटासा पाईप टाकण्यात आला आहे. पण पावसाळ्यात मात्र नाल्यातील पाण्याच्या प्रवाहाला मार्ग मिळाला नाही तर भरत नगर परिसरात पूर परिस्थित निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उल्हासनगर शहरातील भरतनगर येथून वाहणारा नाला वालधुनी नदीला मिळतो. भरतनगर नाल्याचा काही परिसर अंबरनाथ नगरपालिकेमध्ये येत आहे. उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने भरतनगर येथील वालधुनी नदीतील गाळ काढण्याचे काम जेसीबीने सुरू करण्यात आले आहे. अंबरनाथ नगरपालिकेच्या परिसरात येणाऱ्या भरतनगर येथील काही ठिकाणी नाल्याची साफसफाई देखील करण्यात आली नाही. पावसाळा सुरू होणार असूनही अद्याप नाल्याची सफाई झाली नाही. नाल्यांमधील तुंबलेल्या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात रेल्वे ट्रॅक जवळ वाहणाऱ्या या नाल्यात रेल्वेने मातीचा भराव टाकून नाल्याचा प्रवाह पूर्णपणे बंद केल्या असल्याचे त्या ठिकाणावरून दिसून येत आहे. त्यामुळे मुसळधार पावसात नाल्यातील पाण्याला प्रवाह मिळाला नाही तर भरत नगर परिसरात पूर परिस्थिती निर्माण होणार आहे. याशिवाय नाल्याच्या किनारी संरक्षण भिंतही नसल्यामुळे किनाऱ्यावरील राहणाऱ्या नागरिकांच्या घरात नाल्यातील पाणी शिरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शुक्रवारी काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेत्या व नगरसेविका अंजली साळवे उल्हासनगर महानगरपालिकेचे मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी भरतनगर येथील रेल्वे ट्रॅक जवळील नाल्याची पाहणी केली. त्यावेळी अंबरनाथ नगरपालिकेच्या वतीने त्या नाल्यातील साफसफाई देखील करण्यात आली नसल्याचे त्यांच्या निदर्शनात आले. याशिवाय रेल्वे ट्रॅक जवळील नाल्यात पूर्णपणे मातीचा भराव टाकून त्या मातीखाली एक छोटासा पाईप नाल्यातील पाणी जाण्यासाठी लावण्यात आला आहे. त्या ठिकाणी बंद असलेल्या नाल्याच्या प्रवाहामुळे व नाल्यातील साचलेल्या घाणीमुळे पावसाळ्यात त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होणार आहे.

याबाबत काँग्रेसच्या विरोधी पक्ष नेत्या व नगरसेविका अंजली साळवे यांनी अंबरनाथ नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तेजश्री करंजुळे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून भरत नगर येथील नाल्याबाबत व त्या ठिकाणी टाकण्यात आलेल्या मातीच्या भरावाबाबत तसेच पावसाळ्यात त्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होणार असल्याचे सांगितले. त्या ठिकाणी येऊन आपण परिस्थितीचा आढावा घ्यावा अशी विनंती केली. अंबरनाथ नगरपरिषदेचे नगराध्यक्ष तेजश्री करंजुळे यांनी नगरसेविका अंजली साळवे यांना आपण त्या ठिकाणी येऊन पाहणी करू अशा आश्वासन दिले. वेळेस त्या ठिकाणी पावसाळा सुरू होण्याआधीच नाल्याचा प्रवाह खुला केला नाही तर भरतनगर परिसर मुसळधार पावसात पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही





























