उल्हासनगर दि ४ : २ मार्च चा आपला पन्नासावा वाढदिवस आणि मातोश्री कुसुमबाई यांचा ७५ वा वाढदिवस याचे औचित्य साधतं सध्याच्या सामाजिक स्थितीवर आसूड ओढणारे “कोरडा ” या पुस्तकाचे प्रकाशन ख्यातनाम साहित्यिका आणि लेखिका प्रा.आशालता कांबळे यांच्या हस्ते टाऊन हॉल उल्हासनगर येथे एका दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले. मोठ्या एलईडीवर दाखविण्यात आलेल्या नातेवाईक, रेल्वे वरिष्ठ अधिकारी आणि श्याम उबाळे यांच्या पत्नी सारिका यांचे मांडलेले मनोगत, श्याम उबाळे आणि त्यांचे आई वडील यांच्या जीवनावरील चित्रफीत हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण केंद्र बिंदू ठरले.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऍड. शेखर उबाळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक केले त्यात त्यांनी आपली आई कुसुमबाई आणि छोटे बंधू श्याम उबाळे यांच्या संघर्षमय जीवन प्रवास मांडला आणि संपूर्ण उबाळे कुटुंबीय जे विविध स्तरावर मानाचे पद भूषवित आहेत त्यामागे वडील स्मृतीशेष बुधाजी उबाळे गुरुजी यांचे योगदान आहे. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते पत्रकार श्याम उबाळे यांचा शैक्षणिक, व्यावसायिक, पत्रकारिता आणि रेल्वे प्रवासी संघटना आणि त्यांनी सुरु केलेल्या विविध सामाजिक संस्थामार्फत केलेल्या भरीव कामाचे चित्रफित दाखविण्यात आली ती पाहून उपस्थित सर्वच भारावून गेलेले बघायला मिळाले.
शयाम उबाळे लिखित सामाजिक विविध प्रश्नावर आधारलेले चुकीच्या सरकारी धोरणांवर परखड पणे आसूड ओढलेल्या लेखाचे “कोरडा “पुस्तकं प्रकाशन प्रख्यात साहित्यिका आणि लेखिका प्रा. आशालता कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या मनोगतात श्याम उबाळे यांनी बाबासाहेब वाचले आणि जीवनात आत्मसात केले तर प्रत्येकाच्या जीवनाचे निश्चितच सोने होईल आणि बाबासाहेब १ रुपयातील ९० पैसे समाजासाठी आणि १० पैसे घराकरिता खर्च करीत हाच आदर्श घेऊन आपण आपल्या मिळकतीतील १ रुपयातील किमान १० पैसे समाजाकरिता खर्च करतोय आणि आदिवासी पाडे,आश्रमशाळा, वृद्धाश्रम, सामान्य प्रवाशांच्या दळण वळणातील व्यथा दूर व्हाव्यात आणि महिला, दिव्यांग , वृद्ध, चाकरमानी याकरिता गेली २८ वर्ष काम करतोय त्यातुन” कोरडा “पुस्तकात मांडणी केलेय.
या कार्यक्रमात प्रा. आशालता कांबळे यांनी श्याम उबाळे यांच्या मातोश्री आणि पत्नी यांच्या त्यागाचे विशेष कौतुक केले याच सोबत कोरडा या पुस्तकातील समाजाच्या विदारक परिस्थितीचे चित्रण आपल्या पुस्तकात उत्तम रित्या मांडलेय त्यामुळे निश्चितच हे पुस्तकं चळवळीतील कार्यकर्ता, तरुण सुशिक्षित वर्ग आणि पत्रकार यांनी एकदा तरी वाचायला हवे असें आवाहन करुन श्याम उबाळे यांच्या लिखाणाचे कौतुक केले. या कार्यक्रमात बोधामृत सोशल वेलफेअर फाऊडेशन तर्फे परिवारातील कडोमनपा शहर अभियंता पदावर नुकतेच सेवानिवृत्त झालेले अर्जुन अहिरे, मुंबई मनपातुन शहर अभियंता पदावरून सेवा निवृत्त झालेले महेंद्र उबाळे, जिल्हा परिषदेतील सेवानिवृत्त केंद्र शिक्षक जगदीश गायकवाड, पोलीस दलातून पोलीस उपनिरीक्षक पदावरून सेवानिवृत्त झालेले अशोक घनघाव यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला उबाळे परिवाराचे नातेवाईक आप्तेष्ट यासह क्लास वन अधिकारी म्हणून निवृत्त झालेले बाळाराम जाधव टिटवाळा, ठाणे जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे राहुल भालेराव, कल्याण कसारा कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव आणि संघटनेतील सर्व सहकारी, असनोली ग्रा.प. उपसरपंच रत्ना घनघाव,आटगावचे उपसरपंच नामदेव सोकांडे, शहापूरातील प्रख्यात उद्योजक अरुण शेलार, मनोज बागुल व संजय उबाळे, मुंबई मनपा अभियंता अजय जाधव , गजेंद्र जाधव, दिग्दर्शक लेखक यश थोरात, कल्याण शिवसेना उपशहर प्रमुख विद्याधर भोईर, मनसे उपशहर प्रमुख भूषण जाधव इत्यादी मान्यवर यांनी या सोहळ्यास उपस्थिती दर्शविली.
या कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रसिद्ध सूत्रसंचालक शशिकांत चव्हाण यांनी तर आभार प्रदर्शन वैभव उबाळे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशाल जाधव, सचिन गायकवाड, श्रीकांत उबाळे, अक्षय उबाळे, गौरव गायकवाड,वैभव उबाळे, सुगत गायकवाड, अजय घनघाव, प्रविण जगताप यांनी विशेष मेहनत घेतली.





























