उल्हासनगर दि. १५ ( प्रमोद दळवी ) : कल्याण-अंबरनाथ रस्त्यावर सुरू असलेल्या रस्ते बांधकाम प्रकल्पाच्या प्रगतीचा तसेच मान्सूनपूर्व आवश्यक कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार कुमार आयलानी यांनी आपल्या कार्यालयात विविध विभाग व संबंधित यंत्रणांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीस भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), महापालिका, अतिक्रमण विभाग, नगररचना विभाग, मालमत्ता विभाग, वाहतूक विभाग, सिटी इंजिनिअर तसेच रस्ते बांधकाम करणाऱ्या तिन्ही कंत्राटदारांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत आमदार आयलानी यांनी आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांची सविस्तर माहिती घेतली. नाले व पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची कामे वेळेत पूर्ण करण्याबरोबरच रस्त्यांवरील खड्डे बुजवणे, डिव्हायडर उभारणी आणि उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. पावसाळ्यात नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये आणि वाहतूक सुरळीत राहावी, यावर त्यांनी विशेष भर दिला.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतिनगर वेलकम गेट ते १७ सेक्शनपर्यंतचे रस्ते बांधकाम जवळपास पूर्ण झाले असून केवळ डिव्हायडर व काही किरकोळ कामे शिल्लक आहेत. तसेच उर्वरित दोन कंत्राटदारांकडील कामेही ८० ते ९० टक्के पूर्ण झाली आहेत. सर्व कंत्राटदारांनी कामाचा वेग वाढवून दर्जेदार काम पूर्ण करावे, असे निर्देश आयलानी यांनी दिले. रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरत असलेल्या १६ दुकानांच्या प्रश्नावरही बैठकीत चर्चा झाली. यावेळी व्यापार प्रकोष्ठाचे अध्यक्ष नरेश ठारवानी, महापालिकेच्या अतिक्रमण व मालमत्ता विभागाचे अधिकारी तसेच कायदेशीर सल्लागार उपस्थित होते. संबंधित प्रकरण उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. दुकानदारांच्या पुनर्वसनासाठी महापालिकेकडे उपलब्ध पर्यायी जागांचा विचार करण्याच्या सूचना आयलानी यांनी दिल्या. जेणेकरून रस्त्याचे बांधकाम लवकर पूर्ण होऊ शकेल आणि बाधित व्यापाऱ्यांना न्याय मिळू शकेल.

याशिवाय, रस्ता रुंदीकरणामुळे बाधित झालेल्या अन्य दुकानदारांच्या पुनर्वसनाच्या विषयावरही चर्चा करण्यात आली. या प्रकरणी लवकरात लवकर निर्णय घेऊन व्यापाऱ्यांना दिलासा देण्याची अपेक्षा आमदार आयलानी यांनी व्यक्त केली. बैठकीत कल्याण-अंबरनाथ रस्त्यावरील ७ प्रमुख चौकांच्या सुशोभीकरणाच्या आराखड्यावरही विशेष चर्चा झाली. शांतिनगर, स्मशानभूमी चौक, डर्बी हॉटेल चौक, १७ सेक्शन चौक, शिवाजी चौक आणि इतर चौकांसाठी विशेष आराखडे, आकर्षक रोषणाई, हरित क्षेत्रे आणि सुशोभीकरण योजना तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. पुढील आठवड्यात प्राथमिक आराखडा सादर करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी आमदार कुमार आयलानी म्हणाले की, “कल्याण-अंबरनाथ रस्ता हा शहराची महत्त्वाची जीवनवाहिनी असून त्याला आधुनिक, सुरक्षित आणि आकर्षक स्वरूप देण्यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून काम सुरू आहे. मान्सूनपूर्व आवश्यक कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. तसेच प्रभावित दुकानदारांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.





























