मुंबई दि ३१ ( प्रमोद दळवी ) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी सोहळा शनिवारी पार पडला. सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. राजभवनात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सुनेत्रा पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री बनल्या आहेत. सुनेत्रा पवार यांना तीन खाती मिळाली आहेत. यामध्ये राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्यक विकास ही खाती मिळाली आहेत.

दरम्यान, सुनेत्रा पवारांनी पक्षाची सुत्रे हाती घ्यावीत अशी मागणी नेत्यांकडून होत होती. त्यात शनिवारी सकाळी देवगिरी निवासस्थानी येथे सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांनी सुनेत्रा पवारांची भेट घेतली. याच ठिकाणी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत जनभावना लक्षात घेऊन सुनेत्रा पवार यांच्या नावाची निवड करण्यात आली. त्यानंतर हे सगळे नेते बैठकीतून बाहेर पडले. मग सुनेत्रा पवारांसह सगळेच नेते विधान भवनात पोहचले. याठिकाणी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात अजित पवारांच्या प्रतिमेला श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची निवड झाली. अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते होते ते खाते सुनेत्रा पवार यांना देण्यात आलेले नाही. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. सुनेत्रा पवार यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पोस्ट करत त्यांच्या पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी पंतप्रधान मोदी यांन अजित पवार यांचाही उल्लेख केला.
शपथविधीनंतर ट्विट करत सुनेत्रा पवार म्हणाल्या, “आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. आज त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्य भावनेने उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताना मन अक्षरशः भरून येत आहे.” “दादांच्या अकाली जाण्याने मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असला, तरी त्यांनी शिकवलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतीची बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे काम करत राहीन, असेही सुनेत्रा यांनी म्हटले आहे. याच बरोबर, “या कठीण क्षणी महाराष्ट्रातील जनतेने दिलेली प्रेमाची साथ हेच माझे बळ आहे. आपल्या विश्वासाच्या जोरावर, दादांच्या विचारांना उजाळा देत, नव्या आशेने पुढे चालत राहीन,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.





























