उल्हासनगर दि.१४ ( प्रमोद दळवी ) :पाय घसरून पडलेली महिला जखमी अवस्थेत मुरबाड मधून उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आले असता तिला पुढील उपचारासाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात घेऊन जायचे असल्याने तिला तब्बल पाच तास १०८ च्या रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करावी लागल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. वेळीच उल्हासनगरातील समाजसेवक शिवाजी रगडे यांनी रुग्णालयात जाऊन त्या रुग्णवाहिकेचा परत पाठपुरावा केल्याने अखेर त्या जखमी महिलेला रुग्णवाहिका मिळाली. ५ तासात मुंबई ते नागपूर पोहचता यावे म्हणून हजारो कोटी खर्च करून समृद्धी महामार्ग सरकार बनवते . परंतु ५ तासा पासून डोक्याला मार लागलेली एक गरीब महिला ५ तास रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत राहते यावरून ही सरकार कोणासाठी आहे .कोणासाठी काम करते .गरिबांच्या जीवाची काहीच किंमत नाही का असा संताप प्रश्न शिवाजी रगडे यांनी उपस्थित केला आहे.
समाजसेवक शिवाजी रगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार ठाणे जिल्ह्यातील मुरबाड मधील एका गावात काल रात्री मोनिका भोईर ही महिला पाय घसरून पडल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्या गरीब महिलेला कसेतरी करून खाजगी वाहनाने उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी आणले होते. डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता तिच्या मेंदूला गंभीर इजा झाल्यामुळे तिला पुढील उपचारासाठी मुंबईतील केईएम रुग्णालयात जाण्याच्या सूचना दिल्या. सोमवारी दुपारी १२ वाजल्यापासून त्या महिलेचे नातेवाईक १०८ च्या रुग्णवाहिकेला फोन करून मध्यवर्ती रुग्णालयात येण्यास सांगितले होते. वारंवार फोन करूनही १०८ ची रुग्णवाहिका सायंकाळी ५ वाजेपर्यंत मध्यवर्ती रुग्णालयात आली नाही. मोनिका भोईर ही महिला जखमी अवस्थेतच त्या रुग्णवाहिकेची प्रतीक्षा करीत होती. तब्बल पाच तास उलटले तरी १०८ ची रुग्णवाहिका आली नव्हती. त्या गरीब महिलेचे नातेवाईक खूप अस्वस्थ झाले होते. वेळेवर उपचार करणे ही गरजेचे होते. अखेर या घटनेची माहिती उल्हासनगरातील समाजसेवक शिवाजी रगडे यांना मिळताच त्यांनी उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयाकडे धाव घेतली. सर्वप्रथम जखमी अवस्थेत असलेली मोनिका भोईर यांची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी १०८ च्या रुग्णवाहिकेचा पाठपुरावा करत त्यांना चांगले सुनल्यावर अखेर सायंकाळी ५.३० वाजता रुग्णवाहिका मध्यवर्ती रुग्णालयात आली. त्यानंतर त्या महिलेला पुढील उपचारासाठी मुंबईत पठवण्यात आले.
जर गरीब रुग्णांना वेळेवर १०८ रुग्णवाहिका मिळत नसेल तर सरकारची ही सेवा कशासाठी, ही सरकार कोणासाठी आहे, कोणासाठी काम करते, सरकारला गरीबाच्या जीवाची काहीच किंमत नाही का, असा संताप प्रश्न शिवाजी रगडे यांनी व्यक्त केला आहे. काही महिन्यापूर्वी एका युवकाचा वेळेवर रुग्णवाहिका न आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असताना पुन्हा १०८ रुग्णवाहिका बाबत असाच प्रकार घडतो. यावरून राज्य सरकार व १०८ रुग्णवाहिका प्रशासनावर कोणताही परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. कामात हलगर्जीपणा करणाऱ्या १०८ रुग्णवाहिकांवरील संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सर्वत्र केली जात आहे. १०८च्या रुग्णवाहिकांचा गलथान कारभार थांबवायचा असेल तर सर्व राजकीय पक्ष, सर्व संघटनेंनी एकत्र येऊन याबाबत आवाज उठवणे गरजेचे आहे. हे केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच गरीब रुग्णांना वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होईल असे समाजसेवक शिवाजी रगडे म्हणाले.





























