उल्हासनगर दि. ८ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहराचा ७७ वा वर्धापन दिन शनिवारी ८ ऑगस्ट २०२६ रोजी उल्हासनगर महानगरपालिकेच्या मागील बाजूस असलेल्या तरुण तलावाजवळील कोनशिलेपाशी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कोनशिलेला पुष्पहार अर्पण करून शहराला अभिवादन करण्यात आले. यावेळी उल्हासनगरच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा संकल्प उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमाला उल्हासनगर महानगरपालिकेच्या महापौर अश्विनी निकम, सभागृह नेते अरुण आशान, स्थायी समिती सभापती कलवंतसिंग सोहता (बिट्टू भाई), ज्येष्ठ नगरसेवक महेश सुखरामाणी, विरोधी पक्षनेत्या व नगरसेविका अंजली साळवे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, नगरसेवक नाना बागुल, विकास खरात, नगरसेविका सुरेखा सोनवणे, उल्हासनगर महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी प्राजक्ता कुलकर्णी यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात कॅम्प नं – ४ येथील एसएसटी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी रॅली काढून सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी कोनशिलेला पुष्पहार अर्पण करून उल्हासनगर शहराप्रती आपली कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमाचे आयोजन शशिकांत दायमा यांच्या माध्यमातून करण्यात आले होते.

‘सर्व समाजाच्या योगदानातून उल्हासनगरची उभारणी’
यावेळी ज्येष्ठ नगरसेवक महेश सुखरामाणी यांनी शहराच्या इतिहासाचा उल्लेख करत उल्हासनगर हे विविध समाज आणि धर्माच्या नागरिकांनी आपल्या कष्टाने उभे केलेले शहर असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, उल्हासनगर हे विस्थापितांचे शहर म्हणून ओळखले जाते. सिंधी, मराठी, शीख तसेच विविध समाजातील नागरिकांनी एकत्र येऊन आपल्या मेहनतीने आणि घामाने या शहराची उभारणी केली आहे. उल्हासनगरच्या इतिहासात सर्व समाजाच्या नागरिकांचे मोठे योगदान आहे.
उल्हासनगर शहराला हे नाव तत्कालीन राज्यपाल सी. राजगोपालाचारी यांच्या काळात मिळाले. उल्हास नदीच्या नावावरून शहराचे नामकरण ‘उल्हासनगर’ करण्यात आल्याचेही सुखरामाणी यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांत शहराच्या विकासासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून विशेष लक्ष दिले जात असल्याचे सांगताना सुखरामाणी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले. शहराच्या विकासासाठी विविध महत्त्वाच्या प्रकल्पांना निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उल्हासनगरच्या ऑन-सोर्स पाणीपुरवठा योजनेसाठी सुमारे २११ कोटी रुपयांचा निधी, महानगरपालिका इमारतीसाठी २०० कोटी रुपयांचा निधी, तसेच विविध विकासकामांसाठी डीपीआर मंजूर करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. झुलेलाल मंदिर ते बेवस चौक या मार्गाच्या विकासासाठीही निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, हा रस्ता डीपी प्लॅननुसार विकसित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी काळात उल्हासनगर शहराचा चेहरामोहरा बदलण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात विकासकामे केली जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘उल्हासनगरचा कायापालट करण्याचा प्रयत्न’
सभागृह नेते अरुण आशान यांनी ८ ऑगस्ट १९४९ हा दिवस उल्हासनगरच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस असल्याचे सांगितले. याच दिवशी शहराला ‘उल्हासनगर’ ही नवी ओळख मिळाली आणि या शहराच्या विकासाची वाटचाल सुरू झाली, असे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, गेल्या अनेक दशकांमध्ये उल्हासनगर शहराने मोठी वाटचाल केली आहे. गेल्या काही वर्षांपासून शहराच्या विकासाला मोठी गती मिळाली असून, शहराचा कायापालट करण्यासाठी विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून उल्हासनगरच्या विकासासाठी मिळत असलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
शहरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असून, झुलेलाल मंदिर परिसरातील रस्त्यांसह इतर महत्त्वाच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे हाती घेण्यात येत आहेत. तसेच शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी ऑन-सोर्स पाणीपुरवठा हा महत्त्वाचा प्रकल्प असल्याचे आशान यांनी सांगितले. उल्हासनगरची लोकसंख्या वाढत असताना नागरिकांना अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने अनेक वर्षांपासून पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी ऑन-सोर्स पाणीपुरवठा योजना महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘उल्हासनगरवासीयांना पुन्हा शहराकडे आकर्षित करणार’
उल्हासनगर शहरातून रोजगार तसेच अन्य कारणांमुळे अनेक नागरिक स्थलांतरित झाले आहेत. मात्र, शहरात आधुनिक सुविधा, चांगले रस्ते, पुरेसा पाणीपुरवठा आणि सक्षम पायाभूत सुविधा निर्माण झाल्यास हे नागरिक पुन्हा उल्हासनगरकडे आकर्षित होतील, असा विश्वास अरुण आशान यांनी व्यक्त केला. शहराच्या विकासाची ही वाटचाल अशीच सुरू राहिल्यास भविष्यात उल्हासनगरचा कायापालट होऊन शहर पुन्हा ‘हर्ष-उल्हास’ आणि नव्या नाव-रूपाने उजळून निघेल, असेही त्यांनी सांगितले. वर्धापन दिनाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी शहराच्या गौरवशाली इतिहासाला अभिवादन करत आगामी काळात उल्हासनगरला अधिक सुंदर, सक्षम आणि आधुनिक शहर बनविण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.





























