उल्हासनगर दि. ७ (प्रमोद दळवी ) : उल्हासनगरच्या शिवसेनेच्या राजकारणात महत्त्वाची मानली जाणारी एक भावनिक आणि प्रेरणादायी घटना नुकतीच घडली. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज), राजेंद्र चौधरी आणि रमेश चव्हाण हे तिन्ही दिग्गज नेते पुन्हा एकाच फ्रेममध्ये एकत्र दिसल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक कार्यकर्त्यांनी या क्षणाचे स्वागत करत याला संघटनेच्या नव्या पर्वाची सुरुवात असल्याची भावना व्यक्त केली.
एकेकाळी उल्हासनगर हे गुंडाराज, दहशत आणि भीतीच्या वातावरणासाठी ओळखले जात होते. अशा कठीण काळात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली या तिन्ही नेत्यांनी जीवाची पर्वा न करता शिवसेनेचा भगवा प्रत्येक परिसरात पोहोचवण्याचे कार्य केले. राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज), राजेंद्र चौधरी आणि रमेश चव्हाण यांनी संघटना उभारण्यासाठी मोठा संघर्ष केला. त्यांच्या नेतृत्वामुळे आणि कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमामुळे उल्हासनगरमध्ये शिवसेनेची मजबूत संघटनात्मक ताकद निर्माण झाली. पुढे शिवसेना-भाजप युतीची महानगरपालिकेतील सत्ता स्थापन होण्यासाठीही या संघर्षाचा मोठा वाटा असल्याचे ज्येष्ठ कार्यकर्ते सांगतात.
तो काळ सोपा नव्हता. अनेक शिवसैनिकांवर हल्ले झाले, धमक्या मिळाल्या, काही ज्येष्ठ शिवसैनिकांनी बलिदानही दिले. पण शिवसैनिकांचा निर्धार कधी ढळला नाही. मात्र, “आदेश दिघे साहेबांचा आणि प्रेरणा बाळासाहेबांची” हे ब्रीद कायम ठेवत शिवसैनिकांनी संघर्षाची वाट कधीही सोडली नाही. काळाच्या ओघात काही मतभेद निर्माण झाले आणि काही काळ या नेत्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती. मात्र, आज पुन्हा तिन्ही ज्येष्ठ नेते एकत्र आल्याचे चित्र पाहून शिवसैनिकांमध्ये नव्या आशा आणि नव्या आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. सामान्य शिवसैनिकांच्या भावना व्यक्त करत अनेक कार्यकर्ते म्हणत आहेत, “हेच आमचे RRR… हीच आमची ताकद… हीच आमची ओळख!” सत्ता आणि पदे बदलत राहतात, परंतु संघटनेची ताकद ही एकजुटीतच असते. त्यामुळे ही त्रिमूर्ती कायम एकत्र राहावी, अशी अपेक्षा प्रत्येक शिवसैनिक व्यक्त करत आहे. शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, धर्मवीर आनंद दिघे यांचे संस्कार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेची ही एकजूट अधिक बळकट होऊन आगामी काळात शिवसेनेला नवी ऊर्जा आणि नवे यश मिळो, अशी भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.





























