उल्हासनगर दि १८ ( प्रमोद दळवी ) : आरोग्य सभापती सौ. सविता ताई तोरणे-रगडे यांच्या अध्यक्षतेखाली उल्हासनगर महानगरपालिकेच्या मुख्यालयातील आरोग्य विभागाच्या दालनात सार्वजनिक आरोग्य विभागाची पावसाळ्यापूर्वी होणारी नालेसफाई व नियमित स्वच्छता यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली.

या बैठकीस सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे, मुख्य स्वच्छता निरीक्षक एकनाथ पवार, शिवाजी रगडे तसेच सर्व स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते.पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या नालेसफाईचा आढावा घेतला असता प्रशासनाच्या वतीने जवळपास ७५ ते ८० टक्क्यांहून अधिक नालेसफाई पूर्ण झाल्याची माहिती देण्यात आली. प्रभाग समिती क्रमांक ३ मधील वालधुनी नदी, जी कोणार्क कंपनी मार्फत स्वच्छ केली जाते, त्यांच्या कामाबाबत आरोग्य सभापतींनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर्षी सफाईचे काम समाधानकारक पद्धतीने झाले नसल्याची तक्रार सभापतींनी नोंदवली. तसेच उल्हासनगर शहरातील इतर मोठ्या नाल्यांमध्ये सुरू असलेल्या सफाई कामा बद्दल देखील नाराजी व्यक्त करून पावसाळ्यात पाणी साचणे, नाले तुंबणे किंवा त्यामुळे नागरिकांचे नुकसान झाल्यास संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशा कडक सूचना सभापतींनी दिल्या. वालधुनी नदीमध्ये पुढील दोन दिवसांत पुन्हा मशिनरी उतरवून सखोल स्वच्छता करण्याचे आदेश देण्यात आले.
याशिवाय, कोणार्क कंपनीकडून शहरातील कचरा उचलण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असतानाही शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे दिसून येत आहेत, याबाबतही सभापतींनी नाराजी व्यक्त केली. कचरा संकलन व्यवस्थेबाबत एक आठवड्याच्या आत सविस्तर नियोजन तयार करून पुढील आठवड्यात पुन्हा बैठक घेण्यात येईल तसेच उल्हासनगर शहर कचरामुक्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या सूचना सभापतींनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.





























