उल्हासनगर दि.१३ ( प्रमोद दळवी ) : शाळा सुरू होऊन जवळपास दीड महिना उलटूनही उल्हासनगर महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश व आवश्यक शैक्षणिक साहित्य मिळाले नसल्याचा मुद्दा ‘एक हात मदतीचा’ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय कदम यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यांच्या मागणीची दखल घेत महापालिकेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना लवकरात लवकर गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.
महापालिकेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती सामान्य असून, शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतरही त्यांना आवश्यक साहित्याची प्रतीक्षा करावी लागत होती. विद्यार्थ्यांना गणवेशासोबतच लेखन साहित्य, वह्या, दप्तर, रेनकोट, पाण्याची बाटली, एक जोडी बूट आणि दोन जोडी पायमोजे मिळणे अपेक्षित होते. मात्र शाळा सुरू होऊन दीड महिना होत आला तरी हे साहित्य विद्यार्थ्यांना उपलब्ध झाले नव्हते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच त्यांना आवश्यक सुविधा वेळेत मिळाव्यात, यासाठी ‘एक हात मदतीचा’ सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय कदम यांनी उल्हासनगर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाचे मा. प्रशासन अधिकारी यांना पत्र देऊन तातडीने गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्याची मागणी केली होती.
संस्थेच्या या मागणीची महापालिका प्रशासनाने सकारात्मक दखल घेतली असून, विद्यार्थ्यांना लवकरात लवकर गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. त्यामुळे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.विद्यार्थ्यांच्या मूलभूत शैक्षणिक गरजांसाठी केलेल्या मागणीला प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याबद्दल ‘एक हात मदतीचा’ सामाजिक संस्थेच्या वतीने मा. प्रशासन अधिकारी तसेच शिक्षण विभागाचे अध्यक्ष विजय कदम यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.
विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश व शैक्षणिक साहित्य उपलब्ध झाल्यास त्यांचा शाळेतील सहभाग अधिक उत्साहाने वाढण्यास मदत होईल. तसेच आर्थिकदृष्ट्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा आधार मिळणार असल्याने या निर्णयाचे पालक व सामाजिक क्षेत्रातूनही स्वागत होत आहे. “महापालिका शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला आवश्यक शैक्षणिक सुविधा वेळेत मिळाव्यात, हीच आमची भूमिका आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रशासनाने घेतलेला हा सकारात्मक निर्णय स्वागतार्ह आहे. अशी भावना ‘एक हात मदतीचा’ सामाजिक संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.





























