मुरबाड दि. ८ : अचानक नदीला पूर आल्याने त्या पुराच्या पाण्यात म्हैशीचे पारडु वाहू लागतातच त्याचा जीव वाचवण्यासाठी एका शेतकऱ्याने नदीत उडी घेतली असता त्या शेतकऱ्याचा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुखद घटना मुरबाड तालुक्यातील धसई जवळील पळू गावाच्या परिसरात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुरबाड तालुक्यातील धसई जवळील पळु गावातील शेतकरी बाळकृष्ण यादव मोरे हे म्हैशी चारण्यासाठी नदीच्या कडेला गेले होते . त्या वेळी पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला अचानक मोठ्या प्रमाणात पुर आला . आल्याने त्या पुरामध्ये शेतकरी बाळकृष्ण यादव मोरे यांच्या म्हैशीचे एक पारडु नदीमध्ये वाहुन जाऊ लागले. त्या पारडुला वाचवण्यासाठी बाळकृष्ण यादव मोरे यांनी नदीच्या प्रवाहात ऊडी मारली मात्र पाण्याचा प्रवाहाचा वेग मोठ्या प्रमाणात असल्याने दुर्दैवाने ते वाहून गेले. संध्याकाळ पर्यंत बाळकृष्ण यादव मोरे घरी आले नसल्याने त्यांची पळु गावातील ग्रामस्थांनी युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू केली. शेवटी जवळपास दुसऱ्या दिवशी अथक प्रयत्नानंतर पेंढरी गावाजवळील नदीच्या काठावर त्यांचा मृतदेह आढळून आला. या दुःखद घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .





























