मुंबई दि.२४ : राज्यात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात झालेल्या अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे असून महायुती सरकारचे सर्व मंत्री पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा करून तेथील पिकांच्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. धारशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे स्वतःदेखील धाराशिव जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. शिवसेना पक्षाच्या वतीने मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी आज तातडीने मदत पाठवण्यात आली आहे.

मराठवाड्यातील अतिवृष्टीबाबत कालच शिंदे यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून बोलून त्यांच्याकडून माहिती घेतली. ते स्वतः धाराशिवला जाणार असून भूम, परांडा, कळंब या तालुक्यांना भेट देणार आहेत. मराठवाड्यातील सर्व जिल्हे, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात काही भागात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. पावसामुळे काही भागात संपूर्ण जमीन खरडून वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. आज पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत याबाबत गांभीर्याने चर्चा झाली असून शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार जलदगतीने जमिनींचे पंचनामे करणे तसेच जनावरांची हानी झाली आहे त्याला तातडीने मदत देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार महायुतीचे सर्वच मंत्री अतिवृष्टीग्रस्त भागांत स्थानिक अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची स्थिती जाणून घेतील. अतिवृष्टीनंतर साथींचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाल्याने आरोग्य मंत्री मा. प्रकाश आबिटकर हे स्वतः मराठवाड्याचा दौरा करणार आहेत.
यासंदर्भात आज पत्रकार परिषदेत सर्व उपाययोजनांची माहिती देण्यात आली. यावेळी परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक, खासदार मिलिंद देवरा, आमदार प्रा.मनिषा कायंदे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, कॅप्टन अभिजीत अडसूळ, मंगेश चिवटे उपस्थित होते.

शिवसेना पक्षाच्या वतीने मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी आज तातडीने मदत पाठवण्यात आली. मदत घेऊन जाणाऱ्या वाहनांना शिवसेनेचे मुंबईतील कार्यालय बाळासाहेब भवन येथे भगवा झेंडा दाखविल्यानंतर हे ट्रक मदत साहित्य घेऊन धाराशिव जिल्ह्याकडे रवाना झाले आहेत . यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडून पाठवण्यात येणारं डॉक्टरांचे पथक, जीवनावश्यक वस्तूंची किट्स, घरात लागणाऱ्या वस्तू आणि औषधांचा समावेश असेल. असे ५० ते ६० ट्रक अतिवृष्टीग्रस्त भागात पाठवण्यात येणार आहेत.






























