भिवंडी दि.२१( प्रमोद दळवी ) : भिवंडी तालुक्यातील गोरसई गावातून वाहणाऱ्या कामवारी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्याच्या खोलपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

कामवारी नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झालेल्या त्या दोन सख्ख्या भावांची नावे सागर परशुराम धुमाळ व अक्षय परशुराम धुमाळ अशी आहेत. दुपारी तीन वाजेच्या सुमारास भिवंडी तालुक्यातील गोरसई गावाच्या वेशीवरून वाहणाऱ्या कामवारी नदीत हे दोघे सख्खे भाऊ पाहण्यासाठी गेले होते. सतत पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी वाढलेली होती. अक्षय हा पोहण्यासाठी पाण्यात उतरला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्याच्या पात्रात बुडू लागला. त्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यासाठी सागर हा गेला असता ते दोघेही खोल पाण्यात बुडाले. या घटनेची माहिती पाहणाऱ्या एका मित्राने गावात दिल्यानंतर गावातील असंख्य तरुणांनी त्या नदीच्या ठिकाणी धाव घेतली. त्यांनी नदीच्या पात्रात उतरून त्या दोन्ही भावांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

या घटनेची माहिती मिळताच नायब तहसीलदार आदेश म्हात्रे हे सुद्धा घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी साडेसात वाजता अंधार झाल्याने अग्निशामक दलाच्या जवानांनी शोध मोहीम थांबवले. सकाळी पुन्हा एनडीआरएफच्या जवानांनी शोध मोहीम हाती घेऊन दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
.





























