उल्हासनगर दि. १२ ( प्रमोद दळवी ) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उल्हासनगर शहरात मोठ्या उत्साहात साजरी होत असते. या जयंतीनिमित्त शहरात विविध सामाजिक संस्था आणि मंडळातर्फे भव्य शोभायात्रा व रॅलीचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे १३ ते १४ एप्रिल २०२६ रोजी शहरात सुरक्षा व्यवस्था व वाहतूक नियंत्रण व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने परिमंडळ – ४ चे पोलीस उप आयुक्त, व उल्हासनगर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त यांच्याकडे करण्यात आली असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अजय साबळे यांनी दिली आहे.
पोलीस अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात सांगण्यात आले आहे. येत्या १३ व १४ एप्रिल २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार आहे. या मंगल दिनानिमित्त शहरात विविध सामाजिक संस्था आणि मंडळांतर्फे भव्य शोभायात्रा व रॅलींचे आयोजन करण्यात येते.या कार्यक्रमांचे गांभीर्य आणि जनसमुदायाची मोठी उपस्थिती लक्षात घेता शहरात १) सुरक्षा व्यवस्था : रॅलीच्या मार्गावर व मुख्य चौकात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात यावा. २) वाहतूक नियंत्रण : भाविक व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पर्यायी मार्गांचे नियोजन करून वाहतूक सुरळीत ठेवावी. ३) शिस्त व शांतता : शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहील यादृष्टीने विशेष भरारी पथके तैनात करण्यात यावीत. सदर कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि शांततेत पार पाडण्यासाठी आपल्या स्तरावरून योग्य ती सुरक्षा व वाहतूक नियंत्रण व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने परिमंडळ – ४ चे पोलीस उप आयुक्त, व उल्हासनगर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे.





























