- पूर्वेकडील तिकीट खिडक्या एक दिवस बंद.
- पश्चिमेकडील तिकीट खिडकीवर प्रवाशांची गर्दी
उल्हासनगर दि.१७ ( प्रमोद दळवी ) : मध्य रेल्वेच्या उल्हासनगर स्थानकातील पूर्वेकडील तिकीट काउंटर वरील स्लॅब बुधवारी सायंकाळी अचानक कोसळल्याने तिकीट काउंटर वरील कर्मचारी त्यात बचावले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र डागडूजीसाठी बुधवारी रात्री १० वाजल्यापासून ते गुरुवारी दुपारी ४ वाजेपर्यंत पूर्वेकडील तिकीट खिडक्या बंद असल्याचे फलक लावण्यात आले होते. त्यामुळे सकाळपासून प्रवाशांचे चांगलेच हाल झाले आणि त्यांना पश्चिमेकडील तिकीट खिडक्यावर धावपळत जावे लागले.

मध्य रेल्वेच्या उल्हासनगर स्थानकात पूर्वेकडील ३ तिकीट खिडक्या आहेत. तर पश्चिमेकडील २ तिकीट खिडक्या आहेत. बुधवारी सायंकाळी पूर्वेकडील तिकीट खिडक्यावर कर्मचारी तिकीट देण्याचे काम करत असताना अचानक वरील पीओपी चा स्लॅब कोसळला. त्यामुळे कर्मचारी खूपच घाबरले आणि त्यांनी तिकीट काउंटर च्या बाहेर धाव घेतली. या दुर्घटनेत कर्मचारी बाल बाल बचावले. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. या घटनेमुळे रात्री १० वाजल्यापासून पूर्वेकडील तिन्ही तिकीट खिडक्या बंद ठेवण्यात आल्या. याशिवाय त्या ठिकाणी डागडूजीच्या कामाला सुरुवात ही करण्यात आली. सर्व रेल्वे प्रवाशांना सूचना देण्यासाठी तिकीट काउंटर च्या बाहेर रात्रीपासूनच फलक लावण्यात आले होते. त्या फलकावर बुधवारी रात्री १० वाजल्यापासून ते गुरुवारी दिनांक १७ जुलै २०२५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत पूर्वेकडील सर्व ३ खिडक्या बंद राहतील अशा सूचना प्रवाशांना देण्यात आल्या.

पण सकाळी प्रवास करणारे रेल्वे प्रवाशी धावपळत जेव्हा त्या तिकीट काउंटर जवळ गेले तेव्हा त्यांना हे तिन्ही काउंटर बंद दिसल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. काही प्रवासी वेळेवरच रेल्वे स्थानकात येत असतात. पण या बंद असलेल्या खिडक्या पाहून त्यांना पश्चिम कडील रेल्वे तिकीट काउंटर कडे धाव घ्यावी लागली. हा प्रकार दिवसभर असाच सुरू होता. त्यामुळे प्रवाशांचे खूपच हाल झाले. उल्हासनगरातील रेल्वे स्थानकातील तिकीट काउंटरचा परिसरात सर्वत्र ठिकाणी दुरुस्तीची गरज असल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे. याशिवाय काही महिन्यापूर्वी दुरुस्ती देखील करण्यात आली होती. ते काम कशा पद्धतीने केले आहे याची देखील पाहणी होणे गरजेचे आहे. बुधवारी सायंकाळी अचानक घडलेल्या या घटनेमुळे उल्हासनगर रेल्वे स्थानकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या समस्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पाहणी करावी अशी मागणी सर्वत्र केली जात आहे.





























