उल्हासनगर दि २६ ( प्रमोद दळवी ): उल्हासनगरात वाहतूक विभागाच्या पोलिसांनी ओवरसीट चालवणाऱ्या रिक्षाचालकांवर दहा हजार रुपयाची दंडात्मक कारवाईला सुरुवात केल्याने गेल्या आठवड्यात संताप झालेला रिक्षा चालकांनी रमाकांत चव्हाण रिक्षा युनियनचे अध्यक्ष हरजिंदरसिंह भुल्लर (विक्की भाई) यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक विभाग पोलीस कार्यालयावर धडक देत ही कारवाई न थांबल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर देखील वाहतूक पोलिसांनी जवळपास ६२ रिक्षाचालकांवर प्रत्येकी दहा हजार रुपयाची दंडात्मक कारवाई केल्याने अखेर उल्हासनगरातील रिक्षाचालकांमध्ये संताप्त वातावरण निर्माण झाले. पोलीस प्रशासनाच्या अन्यायकारक वागणुकीच्या विरोधात, व रिक्षा चालकांवरील अन्याय थांबवण्यासाठी हजारोच्या संख्येने रिक्षाचालकांनी वाहतूक विभाग पोलीस कार्यालयावर धडक देत ही कारवाई न थांबवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

गेल्यात आठवड्यात वाहतूक विभागाच्या पोलिसांनी १० रिक्षा चालकांवर प्रत्येकी दहा हजार रुपये दंडात्मक कारवाई केली होती. पण न्यायालयाने रिक्षाचालकांना दिलासा देत त्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये दंडात्मक कारवाई केली होती. त्याचवेळी वाहतूक विभागाच्या पोलिसांना रमाकांत चव्हाण रिक्षा युनियनचे अध्यक्ष हरजिंदरसिंह भुल्लर (विक्की भाई) व युनियनचे सरचिटणीस आप्पा कुलकर्णी यांनी वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई न थांबवल्यास आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला होता. पण त्यानंतर देखील ६२ रिक्षाचालकांवर ही दंडात्मक कारवाई केल्याने उल्हासनगरातील शेकडो रिक्षाचालकांनी विक्की भुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी वाहतूक पोलीस आयुक्त कार्यालयावर धडक देत वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी ही कारवाई कायदेशीर असल्याचे व ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगितले. त्यामुळे संतापलेल्या रिक्षाचालकांनी घोषणाबाजी करत आपला राग व्यक्त केला. दरम्यान युनियनचे पदाधिकाऱ्यांनी सोमवारी बैठक घेऊन बेमुदत बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. एकंदरीत पोलिसांच्या या दंडात्मक कारवाईमुळे रिक्षाचालकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.

आता रिक्षाचालकांचे पदाधिकारी कोणती भूमिका हाती घेणार याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन रिक्षाचालकांच्या समस्या मांडण्यात येणार असल्याचे विक्की भुल्लर यांनी सांगितले. पोलिसांनी रिक्षा चालकांवरील ही अन्यायकारक दंडात्मक कारवाई थांबवली नाही तर रिक्षाचालकांनी बोंबाबोंब आंदोलन व अर्धा चड्डी आंदोलनाचा इशारा देखील दिला आहे. तसेच रमाकांत चव्हाण रिक्षा युनियनच्या वतीने वाहतूक विभागाच्या पोलीस अधिकारी यांना रिक्षा चालकाच्या समस्येचे निवेदन देण्यात आले आहे.






























