- वृद्धावस्थेतील योगसाधना
वार्धक्यावस्था हा एक वेगळाच पण मनुष्याच्या जीवनातील अविभाज्य प्रांत आहे.जन्म आणि मृत्यू या प्रवासातील पहिला आणि शेवटचा टप्पा.बालपण,तरुणपण संपल्यानंतरचा क्लिष्ट प्रवास. आयुष्याचा हा अखेरचा प्रवास म्हणजे जणू गमावण्याचा काळ असतो. जसे पैशांची आवक थांबून फक्त पैसे खर्च होत असतात.स्वत्वाची भावना नाहीशी होते.स्वातंत्र्य गमावलेले असते.तब्येतीच्या अनेक तक्रारी सुरू झालेल्या असतात.ऐकू कमी येते,दृष्टी मंदावते,शरीराच्या हालचाली मंदावतात,गाढ झोप लागत नाही वगैरे.एकंदर आपण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या कमावलेले गमवत असतो.भरीस भर जोडीदारांचा,आप्तस्वकीय, मित्रांचा अंत,मुलांचा वियोग, नातवंडांपासून दुरावा याचा सामना करावा लागत असतो.या सर्वांवर कळस म्हणजे आपलीही वाटचाल मृत्यूच्या दिशेने होत असणे याची पदोपदी होणारी जाणीव.यामुळे मानसिक स्वास्थ्यही बिघडून जाते.
दीर्घ जीवन जगण्याची प्रबळ आशाच मनुष्याला वृद्धावस्थेवर मात करण्याची शारीरिक आणि मानसिक ताकद देते.यासाठी मनाची ठेवण मजबूत बनवणे आणि टिकवणे खूप आवश्यक आहे.सुदृढ मन आणि मानसिक स्वास्थ्याच्या जोरावर मनुष्य वृद्धावस्थेतही सुखी जीवन जगू शकतो.
म्हातारपण म्हणजे शारीरिक आणि मानसिक दुर्बलता असे समीकरण बनले आहे.उमेदीच्या वयात जरी काळजी घेतली तरी काही प्रमाणात का होईना म्हातारपणी शारीरिक आणि मानसिक अस्वास्थ्याशी सामना हा करावाच लागतो.उमेदीच्या काळात घेतलेल्या काळजीमुळे मनुष्य मानसिक दृष्ट्या सुदृढ राहतो आणि त्या जोरावर येणाऱ्या आजारांचा स्वतःला आणि कुटुंबातील इतरांना त्रास न होता सामना करू शकतो.
या वयात वारंवार आढळणाऱ्या समस्या म्हणजे लवचिकता कमी होणे, दृष्टीमांद्य, बहिरेपणा,काचबिंदू-मोतीबिंदू,मधुमेह,संधीवात,उच्चरक्तदाब,स्मृतिभ्रंश,कर्करोग,पक्षघातामुळे हालचालींवर झालेला अनिष्ट परिणाम,अस्थिरता,कमकुवतपणा,चक्करयेणे,निद्रानाश,अस्थमा, ऍसिडिटी,पचनशक्ती कमी होणे आणि इतर लहान सहान आजार.याशिवाय मुलांच्या काळज्या,विवाहविषयक समस्या,नातवंडांची चिंता, वाळीत टाकल्याची,एकाकीपणाची भावना,स्वतः चे कर्जबाजारीपण किंवा आर्थिक चिंता,सामाजिक बहिष्कार यामुळे वृद्धांच्या आयुष्याचा स्तर खालावतो.या सर्व चिंता निद्रानाशाकडे घेऊन जातात.आहारविहाराकडे दुर्लक्ष व्हायला लागते.परिणामी मेंदूला होणारा रक्तपुरवठा कमी होऊन अशी व्यक्ती भ्रमिष्टावस्थेची बळी होते.परंपरागत मूल्यांची झालेली घसरण आणि ढासळती कुटुंबावस्था याचा खूप जवळचा संबंध आहे.एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.या दोन्ही बाजू सुदृढ राहिल्या तरच सुदृढ निरोगी जीवन जगता येईल.
योगामध्ये या दोन्ही बाजूंचा समतोल सांभाळला गेला आहे.योगाभ्यासामुळे शरीरस्वास्थ्य आणि मनस्वास्थ्य निरोगी ठेवण्याची ताकद मिळते,जी वार्धक्यावस्थेत अत्यंत आवश्यक आहे.योगशास्त्रात म्हातारपणाचा काळ तीन वेगवेगळ्या विभागात विभागला जातो.
१) वय ६० वर्षे ते ७५ वर्षे,२) वय ७५ वर्षे ते ८५ वर्षे,३) वय ८५ वर्षे आणि त्यानंतरचा वयोगट या प्रत्येक गटासाठी आणि दिसून येणाऱ्या आजारांसाठी किती योगासने करावीत,किती वेळ करावीत हा प्रत्येकाच्या मनात सर्वप्रथम येणारा प्रश्न!मी या वयात योगाभ्यास करू शकेन का हा दुसरा प्रश्न!
सर्वप्रथम मनाशी ध्यास हवा की मला माझे म्हातारपण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सुदृढपणे जगायचे आहे,मला परावलंबीत्व नको आहे.त्यानुसार प्रथम स्वतःच्या दिनचर्येची आखणी करणे महत्वाचे आहे.त्यामध्ये नाश्ता,जेवण,व्यायाम,फिरणे,झोपणे,वाचन,मनन,कुटुंबासोबत घालवणेचा वेळ या सर्वांचे वेळापत्रक आखणे आणि शक्यतो त्यानुसार जगण्याचा चिकाटीने प्रयत्न करावा.
आता प्रथम आपण मन:स्वास्थ्य टिकवणेसाठी काय करावे हे पाहू या.आपले मानसिक स्वास्थ्य आपले आपणच राखावे लागते.कारण बहुतांशी आपल्या अस्वस्थतेला आपणच जबाबदार असतो.जे प्रतिकूल बदल थांबविता येत नाहीत ते शांतपणे स्वीकारावेत. स्वतःशीच चरफडल्याने परिस्थिती सुसह्य न होता उलट अधिकच तापदायक वाटू लागते.प्रतिकूल परिस्थितीत शांत कसे रहावे या प्रश्नाआधी प्रतिकूल परिस्थितीत अस्वस्थ होऊन नेमके काय साधते हा प्रश्न स्वतःला विचारावा.अपेक्षा ही प्रत्येकाला असतेच पण अपेक्षेचे आग्रहात रूपांतर होऊ देऊ नये.विचारातला बराच ताण आपण स्वतःच निर्माण केलेला असतो.मला टेन्शन येते याऐवजी मी स्वतः ला टेन्शन आणतो हे वाक्य सत्याच्या जास्त जवळ आहे.मोह,राग,दंभ,मत्सर नीट ओळखून त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.या सर्व गोष्टी लक्षात ठेवून त्याला योगाधार दिला तर निरोगी मन:स्वास्थ्य कठीण नाही.योगाभ्यासात यासाठी १) प्राणायाम २) ध्यानधारणा ३) शवासन ही आसने योग्य मार्गदर्शनाखाली आत्मसात करावीत. थोडक्यात अनिश्चित,अस्थिर,अनपेक्षित वास्तवात मनाचे संतुलन सांभाळण्यासाठी सहनशीलता,वस्तुनिष्ठता,लवचिकता या गुणांचा योगाभ्यासाबरोबर वापर होणे आवश्यक आहे.ध्यानामुळे एकाग्रता वाढते,स्मृतींचे व्यवस्थापन साधते.व्यक्ती जीवनात पूर्णपणे समरस होऊन तिच्यात एकसंघ सतर्कता नांदू लागते.
डॉ.प्रा.प्रकाश माळी
उल्हासनगर-४.





























