उल्हासनगर दि. १३ ( प्रमोद दळवी ) : वाढीव वीज बिलांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत आमदार कुमार आयलानी यांनी सोमवारी आपल्या कार्यालयात महावितरणच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावून त्यांना कडक शब्दांत जाब विचारला. प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींचे एका आठवड्याच्या आत निष्पक्ष, पारदर्शक आणि समाधानकारक पद्धतीने निराकरण करण्याचे निर्देश देत, तसे न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला.
वाढीव वीज बिलांबाबत नागरिकांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याने आमदार कार्यालयाने विशेष मोहीम राबवून नागरिकांकडून तक्रारी मागवल्या होत्या. मोठ्या प्रमाणावर प्राप्त झालेल्या या तक्रारी महावितरणकडे पाठवण्यात आल्या. मात्र, वेळेत योग्य प्रतिसाद न मिळाल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर आमदार कुमार आयलानी यांनी नागरिक आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करून समस्यांवर सविस्तर चर्चा केली. बैठकीदरम्यान ५० हून अधिक नागरिकांची वाढीव वीज बिले महावितरणचे अधिकारी हरीश भराडे यांच्यासमोर सादर करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांनी राज्यभरात वीज बिलांमध्ये वाढ झाल्याचे सांगितले. मात्र, आमदार आयलानी यांनी यावर आक्षेप घेत स्पष्ट केले की, उन्हाळ्यात विजेचा वापर वाढल्यामुळे काही प्रमाणात बिलात वाढ होणे समजण्यासारखे असले, तरी अनेक ग्राहकांना त्यांच्या वापरापेक्षा कितीतरी जास्त रकमेची बिले कशी येत आहेत, याचे स्पष्ट उत्तर महावितरणने द्यावे असे सांगितले.

यावेळी अधिकारी हरीश भराडे यांनी सर्व तक्रारींचे एका आठवड्यात निराकरण करण्याचे आश्वासन दिले. ज्या ग्राहकांच्या मीटरमध्ये तांत्रिक बिघाड किंवा मीटर वेगाने फिरत असल्याचे आढळेल, त्या प्रकरणांमध्ये संबंधित वीज बिले रद्द करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. तसेच, ग्राहकांच्या उपस्थितीत दोन मीटर बसवून त्यांची तुलनात्मक चाचणी करण्यात येईल आणि संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक ठेवण्यासाठी तांत्रिक तपासणी केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. बैठकीला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर थेट आपल्या समस्या मांडत वाढीव बिलांमुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याची व्यथा व्यक्त केली. अनेक नागरिकांनी चुकीच्या बिलांमुळे घरगुती अर्थकारण कोलमडल्याचे सांगितले. नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन आमदार कुमार आयलानी यांनी महावितरण अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या की, ज्या ग्राहकांच्या वीज बिलांसंदर्भातील तक्रारी प्रलंबित आहेत, त्यांचा वीजपुरवठा कोणत्याही परिस्थितीत खंडित करू नये. संबंधित तक्रारींचे समाधानकारक निराकरण होईपर्यंत ग्राहकांना दिलासा देणे ही महावितरणची जबाबदारी असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
आठवडाभरानंतर सर्व तक्रारींचा स्वतः आढावा घेणार असल्याचे सांगत आमदार आयलानी यांनी इशारा दिला की, नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येईल. यावेळी आमदार कुमार आयलानी म्हणाले, “आज अनेक कुटुंबांची वीज बिले त्यांच्या मासिक उत्पन्नापेक्षाही जास्त येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे. कोणत्याही नागरिकावर अन्याय होणार नाही, याची खात्री करणे आणि ग्राहकांच्या तक्रारींना संवेदनशीलतेने व प्राधान्याने न्याय देणे ही महावितरणची जबाबदारी आहे. नागरिकांना न्याय मिळेपर्यंत मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहीन.” असे सांगितले.





























