बारामती दि.२८ ( प्रमोद दळवी ): महाराष्ट्राच्या राजकारणातील कणखर नेतृत्व, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी ८.५० वाजता बारामतीमध्ये झालेल्या एका भीषण विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. ‘VSR’ कंपनीचे खासगी विमान लँडिंग करत असताना भीषण दुर्घटना घाडली. या भीषण दुर्घटनेत विमानातील माननीय अजित दादा पवार (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र) यांच्यासह , विदीप जाधव (मुंबई पोलीस, सुरक्षा अधिकारी – PSO) , कॅप्टन सुमित कपूर (पायलट) ,कॅप्टन संभवी पाठक (को-पायलट) , पिंकी माळी (फ्लाईट अटेंडंट) या सर्व ५ जणांचा अंत झाला.
अपघातावेळी शेतात काम करणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शी महिलेने तो भीषण प्रसंग सांगितला. “विमान विमानतळावर उतरत होते, पण अचानक ते पुन्हा आकाशात वर गेले. हवेतच ते दोन-तीन वेळा गोल फिरले आणि वेगाने खाली कोसळले. जमिनीवर आदळताच विमानाचे एकामागून एक मोठे स्फोट झाले. विमानाचे लोखंडी भाग आणि अवशेष इतक्या जोरात उडाले की ते आमच्या घराच्या छतापर्यंत येऊन पडले,” असे त्यांनी घाबरलेल्या अवस्थेत सांगितले.
हे विमान सकाळी ०८:१० – विमानाने मुंबईवरून बारामतीसाठी टेक-ऑफ केले. सकाळी ०८:४५ – विमान बारामती एअरस्ट्रिपच्या अगदी जवळ आले होते.सकाळी ०८:५० – लँडिंगच्या शेवटच्या क्षणी विमानाने नियंत्रण गमावले. वैमानिकांनी विमान पुन्हा वर नेण्याचा प्रयत्न केला, मात्र तांत्रिक बिघाडामुळे विमान हवेतच अनियंत्रित झाले आणि ‘गोजुबावी’ परिसरातील शेतात कोसळले.
अजित पवार आज बुधवारी बारामतीत जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ४ सभांना संबोधित करणार होते. मात्र, त्यांच्या बालेकिल्ल्यातच हा काळाचा घाला पडला. घटनेची माहिती मिळताच खासदार सुप्रिया सुळे, पार्थ पवार आणि संपूर्ण पवार कुटुंब बारामतीकडे रवाना झाले आहे. महाराष्ट्राचे लाडके नेते गमावल्याने नागरिकांमध्ये अत्यंत दुःखाचे वातावरण आहे. आज बारामतीत शोक व्यक्त करत नागरिकांनी बाजारपेठ बंद केली आहे. बारामतीकर सद्यस्थितीत दुःखाच्या सावटाखाली असल्याचे दिसत आहे. राजकारणातील शिस्तप्रिय असं हरहुन्नरी व्यक्तिमत्व गमावल्याची भावना राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
लोकनेते अजित पवारांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक अन् दुःखद”– पंतप्रधान नरेंद्र मोदी
एक्सवर एक ट्विट करत पंतप्रधान मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली. अजित पवार हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य कार्यकर्त्यांप्रति शोकसंवेदना. ॐ शांती., असे पंतप्रधान मोदी यांनी शोक संदेशात म्हटले आहे.
गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे. आज, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि आमचे ज्येष्ठ एनडीए सहकारी अजित पवार यांचे एका दुःखद अपघातात निधन झाल्याच्या बातमीने मला खूप दुःख झाले आहे. गेल्या साडेतीन दशकांपासून महाराष्ट्रातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी अजित पवार यांनी केलेले समर्पण शब्दात व्यक्त करता येणार नाही. आम्ही जेव्हा जेव्हा भेटायचो तेव्हा ते महाराष्ट्रातील लोकांच्या कल्याणाशी संबंधित विविध मुद्द्यांवर दीर्घ चर्चा करत असत. त्यांचे निधन हे माझे तसेच एनडीए कुटुंबाचे वैयक्तिक नुकसान आहे. मी पवार कुटुंबाप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो. या दुःखाच्या वेळी, संपूर्ण एनडीए शोकाकुल पवार कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो. ओम शांती शांती शांती
अजित पवार यांचा मृत्यू दुर्दैवी आहे. ते राजकारणात माझे जवळचे मित्र होते आणि आमचे कौटुंबिक संबंधही होते. त्यांचे निधन ही एक मोठी हानी आहे. पक्षाच्या वतीने मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, अशी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या सहप्रवाशांचे विमान अपघातात निधन झाल्याची माहिती अत्यंत वेदनादायक आहे. या कठीण, दुःखद प्रसंगी महाराष्ट्राच्या जनतेसोबत आहे. संपूर्ण पवार कुटुंबीयांप्रति संवेदना व्यक्त करतो, असे काँग्रेस खासदार आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्या शोक संदेशात म्हटले आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनावर काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी शोक व्यक्त केला. मी संपूर्ण पवार कुटुंब आणि त्यांच्या समर्थकांप्रति शोक व्यक्त करते. मी अजित पवार यांच्या पत्नी आणि सुप्रिया सुळे यांच्याशी बोलले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं कधीही भरून न येणारी महाराष्ट्राची हानी झाली आहे. आज त्यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. अजित पवार महाराष्ट्राचे लोकनेते होते. महाराष्ट्रातल्या प्रश्नांची जाण असलेला हा नेता होता. त्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड आस्था होती. अतिशय संघर्षशील असं नेतृत्व होते. सर्व परिस्थितीत न डगमगता पुढे जाणारे व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत कठीण दिवस आहे अशी शोक भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. अजित पवारांच्या निधनावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवारांसारखे नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासात ते महत्त्वपूर्ण योगदान देत होते, त्या काळात त्यांचे निघून जाणे हे अविश्वसनीय आणि मनाला चटका लावणारे आहे. माझ्यासाठी दमदार, दिलदार मित्र सोडून गेला आहे. त्यांच्या कुटुंबावर हा प्रचंड मोठा आघात आहे
मोठा भाऊ हरपला… हे महाराष्ट्राचं नुकसान- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
“मनाला वेदना आणि चटका देणारी घटना आहे. अजित दादा इतक्या लवकर आपल्याला सोडून जातील असा विचारही कुणी केला नसेल. अजित दादा गेली अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात नेतृत्त्व करत होते. अतिशय परखड, स्पष्टवक्तेपणा आणि प्रशासनावर असलेली त्यांची पकड आपण पाहिलेली आहे. प्रत्येक गोष्टीवर बारीक अभ्यास करुन बोलण्याची सवय होती. चूक त्याला चूक म्हणणारे असले तरी ते मनाने निर्मळ होते याचा अनुभव मीही घेतलेला आहे. मी मुख्यमंत्री असताना त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम केलं. एकदा कोणतीही गोष्ट करायची ठरवली की ते करायचेच. आम्ही टीम म्हणून महाराष्ट्रासाठी काम केलं. अजित दादांनी सकाळी ६ वाजताही लोकांना भेटत असत. वेळेचं भान ठेवणारा नेता हरपला आहे. परवाच आमची एका कार्यक्रमात भेट झाली होती. आज सकाळी जेव्हा घटना कळली तेव्हा परवाच्याच भेटीची दृश्य समोर येत होती. वयाने आणि अनुभवाने ते माझ्यापेक्षा मोठे होते. त्यामुळे त्यांना राज्यातील प्रत्येक विभागाचा अभ्यास दांडगा होता. त्यांच्या जाण्याने फक्त पवार कुटुंबाचंच नाही संपूर्ण महाराष्ट्राचं न भरुन निघणारं नुकसान झालेलं आहे. एक मोठा भाऊ हरपल्याची भावना माझ्या मनात आहे,” अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.
एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील उमदा सहकारी गमावला- उद्धव ठाकरे
‘‘एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील उमदा सहकारी गमावला,’’ अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली.उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात अजित पवार हे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री होते. अत्यंत शिस्तप्रिय, आपल्या खात्यावर वचक व अर्थ विभागाचा अभ्यास असणारे ते नेते होते. एक उत्तम सहकारी म्हणून त्यांचे माझे विशेष नाते जमले. अजित पवार हे दिलखुलास होते. मनात येईल ते बोलायचे. ते दीर्घद्वेषी नव्हते. राजकारणात त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला, तरी त्यांनी संबंध तुटू दिले नाहीत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
महाराष्ट्रात ते ‘दादा’ म्हणून लोकप्रिय होते. ते असे अकाली जातील असे वाटले नव्हते. कार्यकर्त्यांना जपणारा नेता म्हणून ते परिचित होते. त्यांच्या जाण्याने राज्यातील नेतृत्वात पोकळी निर्माण झाली. ते सर्वार्थाने ‘दादा’ होते. दादांना माझ्यातर्फे, ‘ठाकरे’ व शिवसेना परिवारातर्फे श्रद्धांजली!
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती विमानतळाजवळ विमान अपघातात निधन झाले. समोर आलेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात अजित पवार यांच्या मृतदेहाची ओळख त्यांच्या हातातील घड्याळावरून पटल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताच्या तीव्रतेमुळे ओळख पटवणे कठीण झाले होते. या घटनेवरून अपघात किती भीषण होता, याची कल्पना येते.

अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते होते. आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते अशी विविध पदं त्यांनी भूषवली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द कायमच चर्चेत राहिली. ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांचे काका. त्यांच्याकडूनच अजित पवारांनी राजकारणाचे धडे घेतले होते. महाराष्ट्र जाणणारे, प्रशासनावर वचक असलेले आणि शिस्तप्रिय राजकारणी अशी ओळख त्यांनी निर्माण केली होती. शरद पवारांपासून फारकत घेत, अजितदादांनी पुकारलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली होती. त्यानंतर त्यांनी भाजपाप्रणित महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता आणि ते राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री होते. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे भीषण विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. ते ६६ वर्षांचे होते. अजित पवार १९८२ साली राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी बारामतीत तब्बल ७ वेळा आमदार पद भूषवलं आहे. १९९५ पासून २०१९ पर्यंत सलग ७ वेळा अजित पवार बारामती विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. १९९१ सालपासून अजित पवार विधानसभा सदस्य आहेत. १९९९ ते २००४ या काळात ते पाणीपुरवठा व स्वच्छता, पाटबंधारे आणि फलोत्पादन या खात्याचे राज्यमंत्री होते.१९९१ साली पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अजित पवारांची निवड झाली. अजित पवार १९९१ साली बारामती लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले. या काळात ते कृषी, फलोत्पादन आणि उर्जा या खात्याचे राज्यमंत्री होते. १९९१ ते १९९५ या काळात ते विधानसभा सदस्य होते. अजित पवार नोव्हेंबर १९९२ ते फेब्रुवारी १९९३ या काळात जलसंधारण, ऊर्जा आणि नियोजन या खात्याचे राज्यमंत्री होते. त्यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील ‘देवळाली-प्रवरा’ या ठिकाणी झाला. अजित पवार हे शरद पवारांचे मोठे भाऊ अनंतराव पवार यांचे सुपुत्र आहेत. अजित पवार यांचा विवाह राजकीय नेते पद्मसिंह पाटील यांची बहीण सुनेत्रा यांच्याशी झाला. अजित पवार यांना पार्थ आणि जय अशी दोन मुलं आहेत. अजित पवार यांनी त्यांचे दहावीपर्यंचे शिक्षण देवळाली प्रवरा येथेच पूर्ण केले. त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी मुंबईत आले होते. त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण मुंबईत पूर्ण केलं. त्यांच्याकडे बी. कॉम. ही पदवी आहे.
‘हसवणाऱ्या नेत्याने आज रडवलं‘
अजित पवारांच्या स्वभावातील पैलू उलगडताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, “दादांचा राजकीय आणि अकॅडमिक सेन्स जबरदस्त होता. त्यांच्या भाषणातील विनोदबुद्धीने त्यांनी अनेकांना स्पष्ट बोलूनही हसवलं, पण आज त्यांच्या जाण्याने कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत पाणी आले आहे. त्यांच्यासोबत केलेला प्रवास, मारलेल्या गप्पा आणि चर्चा सदैव स्मरणात राहतील.” असे त्यांनी सांगितले .
आपल्या लाडक्या नेत्याचा अखेरचा निरोप घेण्यासाठी पुणे जिल्हाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो कार्यकर्ते आणि नागरिक बारामतीकडे रवाना झाले आहेत. बारामतीमधील सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले असून, शहरात अत्यंत शोकाकुल वातावरण आहे.विमान अपघातात दुर्दैवी निधन झालेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर उद्या (२९ जानेवारी २०२६) त्यांच्या कर्मभूमीत म्हणजेच बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
दादांच्या अपघातावर शरद पवारांची प्रतिक्रिया : अजित पवारांचा झालेला अपघात हा निव्वळ अपघात आहे. यात राजकारण करू नका. राज्याचे झालेलं नुकसान भरून निघणार नाही.


























