ठाणे दि. ४ : गेल्या काही दिवसांपासून ठाणेकरांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘प्रेसिडेंट कप इंडिया २०२६’ या टेनिस क्रिकेट स्पर्धेचा उद्या, रविवार ५ एप्रिल २०२६ रोजी भव्य सांगता समारंभ पार पडणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला बॉलीवूडचे सुपरस्टार आणि लेजेंडरी अभिनेते संजय दत्त तसेच एव्हरग्रीन ॲक्शन स्टार सुनील शेट्टी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये हा ‘महाअंतिम सोहळा’ पार पडणार असून ठाणेकर या सोहळ्यासाठी सज्ज झाले आहेत.
टेनिस क्रिकेट स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि कार्याध्यक्ष व राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या माध्यमातून प्रेसिडेंड कप – २०२६ ही स्पर्धा सुरू आहे. ३१ मार्च रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेता सलमान खान यांच्या उपस्थितीत ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये या स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन झाले होते. या स्पर्धेत विविध राज्यातील तब्बल १६ संघ सहभागी झाले आहेत. या संघांमध्ये चुरशीचे सामने सुरू आहेत. शुक्रवारी यातील उपांत्यपूर्व आणि उपांत्य सामने रंगले. तर येत्या ५ एप्रिल रोजी स्पर्धेतील उर्वरित उपांत्य आणि अंतिम सामने रंगतील. टेनिस क्रिकेट चाहत्यांचाही या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
उद्घाटनाच्या सोहळ्याप्रमाणे या प्रेसिडेंट क्रीडा स्पर्धेची सांगताही दिमाखदार सोहळ्यात होणार आहे. या कार्यक्रमासाठी सिने सृष्टीतील ऍक्शन स्टार आणि स्वतः सेलेब्रिटी क्रिकेटमध्ये आवर्जून खेळणारा अभिनेता सुनील शेट्टी सहभागी होणार आहे. उद्या संध्याकाळी ५. ३० वाजता सुनील शेट्टी मैदानावर उपस्थित राहून खेळाडूंचा उत्साह वाढणार आहे.
तर सायंकाळी ६.३० वाजता बॉलिवूडचा संजु बाबा अर्थात संजय दत्त मुख्य सांगता सोहळ्यात सहभागी होऊन या क्षणाची रंगत द्विगुणित करणार आहे. प्रेसिडेंट कपचा पहिला विजेता संघ यावेळी देशाला मिळणार आहे. यंदा विजेत्या संघाला तब्बल १ कोटींचे बक्षिस प्रदान केले जाणार आहे. तर मालिकावीर आणि सामनावीर खेळाडूलाही आकर्षक बक्षिसे दिली जातील. त्यामुळे या बक्षिसांची लयलूट कोणता संघ करतो याकडे सर्व टेनिस क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे.
खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे आणि मंत्री डॉ. उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या स्पर्धेचा समारोप अत्यंत दिमाखदार पद्धतीने करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. केवळ क्रिकेटच नव्हे, तर सिनेसृष्टीतील या दिग्गजांना जवळून पाहण्याची संधी ठाणेकरांना मिळणार आहे. या भव्य सांगता समारंभाला आणि महाअंतिम सामन्याला सर्व क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.





























