उल्हासनगर दि २५ ( प्रमोद दळवी ) : दिल्ली येथील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणाविरोधातील आंदोलनाला पाठिंबा दर्शवित उल्हासनगर – ४ येथील सुभाष टेकडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आझाद समाज पार्टी (भीम आर्मी) आणि डॉ. बी. आर. आंबेडकर फोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय शांततापूर्ण संविधानिक लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.

हे आंदोलन आझाद समाज पार्टी भीम आर्मी व डॉ. बी. आर. आंबेडकर फोर्स यांच्या वतीने, ऍडव्होकेट भाई चंद्रशेखर आजाद (मा. खासदार, नगीना लोकसभा मतदारसंघ) यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र सचिव तथा ठाणे जिल्हा प्रभारी संदेश मधुकर सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली या एक दिवसीय शांततापूर्ण संविधानिक लाक्षणिक धरणे आंदोलनत विविध सामाजिक संघटना, पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. होते.
यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या नीट पेपरफुटीविरोधातील आंदोलनाला जाहीर पाठिंबा व्यक्त केला. नीट परीक्षा पेपर लीक प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ झाल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. तसेच या प्रकरणाविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी आणि आंदोलकांवर कथितरीत्या दबाव टाकणे, धाकदपटशा दाखविणे तसेच झालेल्या कथित लाठीमार आणि मारहाणीचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला.

आंदोलनादरम्यान स्वाक्षरी मोहिमेचेही आयोजन करण्यात आले होते. उल्हासनगरातील विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या उत्साहाने या मोहिमेत सहभागी होत स्वाक्षऱ्यांद्वारे आपला निषेध नोंदविला. आंदोलनस्थळी उपस्थित वक्त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत नीट पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेल्या असुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकरणात जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी केली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड करणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहाराला कठोर शिक्षा व्हावी, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली.
मुसळधार पावसातही आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू ठेवत आपला निषेध नोंदविला. या आंदोलनात आझाद समाज पार्टी (भीम आर्मी)चे महाराष्ट्र सचिव तथा ठाणे जिल्हा प्रभारी संदेश मधुकर सकपाळ, डॉ. बी. आर. आंबेडकर फोर्सचे उल्हासनगर शहराध्यक्ष हनुमान कांबळे, शहर संघटक सुरेंद्र गायकवाड, शीतल सकपाळ, शिल्पा बोराडे, डॉ. रजनीकांत गायकवाड, बाळू पगारे, शांताराम निकम, समाजसेवक महेंद्र अहिरे, बागुल यांच्यासह सुभाष टेकडी परिसरातील विविध पक्ष व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनाच्या माध्यमातून नीट पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान व नरेंद्र मोदी यांच्या राजीनामेची आंदोलनकर्त्यांनी जोरदार मागणी केली.





























