ठाणे दि. २५ ( प्रमोद दळवी ) : ज्ञान गंगा एज्युकेशन ट्रस्टच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळ, सांस्कृतिक समिती आणि ग्रंथालय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशीनिमित्त ग्रंथ दिंडी व पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात ट्रस्टचे संस्थापक संचालक प्रा. बी. डी. पाटील यांच्या हस्ते ग्रंथांचे तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या मूर्तींचे गंध, अक्षता व पुष्प अर्पण करून पूजनाने झाली. त्यानंतर ढोल-ताशे आणि लेझीमच्या गजरात ग्रंथ दिंडी काढण्यात आली. महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाच्या गजरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारून टाकला.

विद्यार्थिनींच्या आकर्षक लेझीम पथकाने सादर केलेल्या कौशल्यपूर्ण प्रात्यक्षिकाने उपस्थितांची दाद मिळवली. त्यानंतर महाविद्यालयाच्या सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मृदुंगाच्या साथीने सुमधुर स्वरात भजन व अभंग सादर करून भक्तिरसाची अनुभूती दिली. तसेच विद्यार्थिनींच्या दमदार नृत्याविष्काराने कार्यक्रमात अधिक रंगत आणली.
या कार्यक्रमास पदवी व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. भाविका करकेरा, ट्रस्टच्या सीओओ वंदना शर्मा, पीआरओ प्रा. अनिल आठवले, सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सामूहिक ‘पसायदान’ पठणाने करण्यात आली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संत परंपरेची ओळख, वाचन संस्कृतीची जपणूक आणि भारतीय संस्कृतीविषयी आदरभाव निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.





























