कल्याण, दि.१९ ( प्रमोद दळवी ) : मध्य रेल्वेच्या कल्याण–कसारा मार्गावरील प्रवाशांशी रेल्वे प्रशासनाकडून वारंवार दुजाभाव केला जात असल्याचा आरोप पुन्हा एकदा समोर आला आहे. खर्डी स्थानकात कसारा लोकल तब्बल २० मिनिटांहून अधिक काळ थांबवून राजधानी एक्सप्रेसला मार्ग मोकळा करून देण्यात आल्याने प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली होती .
कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (१९ जुलै) ते शहाड ते उंबरमाळी असा कसारा लोकलने प्रवास करत होते. ही लोकल शहाड स्थानकावर सायंकाळी ४ .१८ वाजता येते. गाडी काही मिनिटे उशिराने आली असली तरी पुढे खर्डी स्थानकात कोणतेही स्पष्ट कारण न देता लोकल दीर्घकाळ उभी ठेवण्यात आली. याबाबत स्थानक व्यवस्थापकांशी संपर्क साधला असता, “पुढे राजधानी एक्सप्रेस गेल्यानंतरच लोकल सोडण्यात येईल,” असे उत्तर देण्यात आल्याचा दावा घनघाव यांनी केला. यानंतर त्यांनी तात्काळ मध्य रेल्वेच्या चीफ कंट्रोलर कार्यालयाशी (022-67455618) संपर्क साधून याबाबत जाब विचारला. मात्र ड्युटीवरील अधिकाऱ्याने “आगे राजधानी एक्सप्रेस जाएगी” एवढेच उत्तर वारंवार दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मराठी आणि हिंदी भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न करूनही अधिकाऱ्याने समाधानकारक स्पष्टीकरण दिले नसल्याचे त्यांनी सांगितले.
“आम्ही काही गुरेढोरे आहोत का? आम्ही फुकट प्रवास करतो का?” असा संतप्त सवाल केल्यानंतरही अधिकाऱ्याने तेच उत्तर दिल्याचे घनघाव यांनी नमूद केले. अखेर खर्डी स्थानकात लोकल 20 मिनिटांपेक्षा अधिक काळ खोळंबून राहिली. या घटनेमुळे लोकलमधील गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नोकरदार तसेच इतर शेकडो प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अनेक प्रवाशांना नियोजित वेळेपेक्षा उशिरा घरी पोहोचावे लागल्याने रेल्वे प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
राजेश घनघाव यांनी रेल्वे प्रशासनावर उपनगरीय प्रवाशांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत, मेल व एक्सप्रेस गाड्यांना प्राधान्य देण्यासाठी लोकल गाड्या विनाकारण अडविण्याची पद्धत तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. “उपनगरीय प्रवाशांच्या वेळेचे आणि सुरक्षेचे महत्त्व रेल्वे प्रशासनाने ओळखले पाहिजे. यापुढेही अशाच प्रकारे लोकल गाड्या अडवून मेल किंवा एक्सप्रेस गाड्यांना प्राधान्य दिल्यास प्रवाशांच्या वतीने ‘रेल रोको’ आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला.कसारा मार्गावरील प्रवाशांशी होणारा कथित भेदभाव तातडीने थांबवून लोकल सेवेला योग्य प्राधान्य द्यावे, अशी मागणी कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे.





























