उल्हासनगर दि २८ : उल्हासनगर महापालिकेचा सार्वजनिक बांधकाम विभाग हा नेहमीच वादग्रस्त राहिलेला असून हा विभाग शहरातील रस्त्याचे काम झाले नाही तरी ठेकेदाराला बिल अदा करण्यात पुढे असतो असे अनेक प्रकारांमधून सिद्ध झाले आहे. दरम्यान वडोल गाव च्या पुला पर्यंत रस्त्याचे काम पुर्ण करण्यात यावे आणि त्या रस्त्याचे काम पुर्ण न होता ठेकेदाराला एक कोटी बिल अदा केले म्हणुन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणी साठी पॅनल १२ च्या माजी नगरसेविका सौ. सविता तोरणे , गजानन शेळके , समाजसेवक शिवाजी रगडे व फिरोज खान हे आमरण उपोषणाला बसले आहेत. माजी नगरसेवक महादेव सोनवणे भगवान मोहिते दशरथ चौधरी रामेश्वर गवई यांच्या हस्ते आदर्शाना पुष्पहार अर्पण करुन उपोषणाला सुरवात करण्यात आली आहे.

उल्हासनगर कॅप ३ येथील पॅनल क्रमांक १२ गुलराज टॉवर ते वडोलगाव पूला पर्यंत रस्ता अद्यापही पूर्णपणे बनलेला नाही. तरी देखील त्या रस्त्याचे काम पूर्ण न होता शहर अभियंता यांनी जय भारत कन्स्ट्रक्शनचे व्यवस्थापक यांना एक कोटीचे बिल दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते शिवाजी रगडे यांनी केला असून या रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू न झाल्याने बुधवारपासून पॅनल क्रमांक १२ च्या माजी नगरसेविका सविता तोरणे रगडे , माजी नगरसेवक गजानन शेळके, शिवाजी रगडे , फिरोज खान, सुमनताई शेळके शालिनीताई गायकवाड रवींद्र केणे गजानन म्हत्रे प्रकाश म्हात्रे शरद म्हात्रे रेखा जाधव सचिन म्हात्रे विनोद म्हात्रे सागर म्हात्रे या समस्त ग्रामस्थांच्या वतीने आमरण उपोषण करण्याचा इशारा वजा निवेदन उल्हासनगर महापालिका आयुक्तांना दिले होते .
मात्र सदर रस्त्याचे काम अद्याप ही सुरु केले नसल्याने उल्हासनगर महानगरपालिका प्रशासना विरोधात विद्यार्थी ,पालक, वडोलगावातील ग्रामस्थ, विविध पक्ष संघटना यांच्या वतीने आमरण उपोषण बुधवार २८ मे सकाळी १० वाजे पासून गुलराज टॉवर चौक रेणुका शिवसेना शाखेजवळ उल्हासनगर ३ येथे सुरु झाले आहे, आंदोलनकर्ते शिवाजी रगडे, गजानन शेळके, फिरोज खान यांचे समवेत अनेक स्थानिक आमरण उपोषणास बसले आहेत. या पूर्वी आमरण उपोषण करण्याचा इशारा वजा निवेदन उल्हासनगर महापालिका आयुक्तांना दिले होते.या निवेदनाची दखल घेत आयुक्तांनी रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेश देखील दिले होते. परंतु संबंधित अधिकारी यांनी आयुक्तांचे आदेश फाट्यावर मारत त्या रस्त्याचे काम सुरु केले नाही. त्यामुळे आम्हाला उपोषणाचा मार्ग स्विकारावा लागला असे शिवाजी रगडे यांनी सांगितले .या उपोषणाला सर्व पक्षानी पाठिंबा दिला असुन प्रत्यक्षात रस्त्याचे काम सुरु होत नाही तो पर्यंत उपोषण सोडणार आही असा निर्धार या उपोषण कर्यानी केला आहे.





























