उल्हासनगर दि. ६ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहरातील पॅनल क्रमांक १२ मधील नागरिकांना पाण्याची भीषण टंचाई असल्याने ही पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी महापौर अश्विनी कमलेश निकम यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन परिस्थितीची पाहणी केली.
उल्हासनगर महानगरपालिकेच्या पॅनल क्रमांक १२ मधील सम्राट अशोक नगर, वडोल गाव तसेच आसपासच्या परिसरात मागील अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. या भागातील नागरिकांना दररोजच्या जीवनात पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी स्थानिकांकडून सातत्याने केली जात होती. विशेषतः वडोल गाव परिसरात पाणीपुरवठा सुधारण्यासाठी जवळपास एक वर्षापूर्वी कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र विविध कारणांमुळे हे काम अद्याप पूर्ण झालेले नसल्याने नागरिकांची गैरसोय अधिकच वाढली आहे. अनेक ठिकाणी पाईपलाईनचे काम अपूर्ण राहिले असून काही भागात नियमित पाणीपुरवठा होत नसल्याची तक्रार नागरिकांनी व्यक्त केली.
या समस्येबाबत नागरिकांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे तसेच स्थानिक नगरसेविका सविता ताई तोरणे-रगडे यांनी प्रशासनाकडे सविस्तर तक्रार नोंदवली. त्यानंतर या गंभीर समस्येची दखल घेत महापौर अश्विनी कमलेश निकम यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष त्या ठिकाणी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. महापौरांनी वडोल गाव आणि सम्राट अशोक नगर परिसरात जाऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. नागरिकांनी पाण्याच्या अनियमित पुरवठ्याबाबत, अपूर्ण राहिलेल्या पाईपलाईन कामाबाबत तसेच कामाच्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली.
यावेळी महापौर अश्विनी कमलेश निकम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्याचे तसेच परिसरातील पाणीपुरवठा नियमित व सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. नागरिकांना लवकरात लवकर दिलासा मिळावा यासाठी प्रशासनाने गांभीर्याने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक नागरिकांनीही महापौरांनी स्वतः येऊन समस्या ऐकून घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि पाणी समस्येचे कायमस्वरूपी निराकरण लवकर व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.





























