उल्हासनगर दि. २१ ( प्रमोद दळवी ) : राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या दि. ९ जुलै २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार मा. मुख्यमंत्री यांच्या जन्मदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून राज्यभर “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत उल्हासनगर शहरातील नागरिकांसाठी विशेष समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन उल्हासनगर महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
तहसीलदार, उल्हासनगर यांच्या अध्यक्षतेखाली हे समाधान शिबिर बुधवार, दि. २२ जुलै २०२६ रोजी टाऊन हॉल, उल्हासनगर-३ येथे सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये महसूल विभागासह केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विशेषतः महिलांना शेतकरी दर्जा प्रदान करून प्रमाणपत्रांचे वितरण, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनदांचे वितरण, मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेचा लाभ, शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत मार्गदर्शन व कार्यवाही, तुकडेबंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी स्थानिक क्षेत्र घोषणा, “जिवंत सातबारा” मोहिमेअंतर्गत सेवा, तसेच सिधी विस्थापितांच्या निवासी व वाणिज्यिक जमिनी फ्री-होल्ड करण्यासाठी विशेष अभय योजना २०२५ ला मुदतवाढ यासंबंधी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
याशिवाय राजमाता जिजाऊ महिला सक्षमीकरण योजना, मातृवंदना योजना, लेक लाडकी योजना, घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी विशेष तरतुदी, कुंभार समाजातील व्यक्तींना पारंपरिक व्यवसायासाठी सवलती तसेच शेतजमिनीच्या कौटुंबिक वाटणीपत्रावरील नोंदणी शुल्क पूर्णपणे माफ करण्यासंदर्भातील सुविधांचाही लाभ नागरिकांना मिळणार आहे. शिबिरामध्ये सेवा हमी कायद्यानुसार विविध महत्त्वाच्या शासकीय सेवाही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र, रेशन कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार योजना, लेक लाडकी योजना, मातृवंदना योजना, घरकुल योजना तसेच इतर विविध शासकीय योजनांसाठी अर्ज स्वीकारणे व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
प्रशासनाने उल्हासनगर शहरातील सर्व नागरिक, लाभार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी तसेच विविध योजनांसाठी पात्र असलेल्या नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह शिबिराला उपस्थित राहून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. या शिबिराची माहिती शहरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचावी, यासाठी माध्यमांनी व नागरिकांनी या उपक्रमाला व्यापक प्रसिद्धी द्यावी, अशी विनंती जनसंपर्क अधिकारी प्राजक्ता कुलकर्णी, उल्हासनगर महानगरपालिका यांनी केली आहे.





























