उल्हासनगर दि ३० : वडोळगाव पुला समोरील रस्त्याच्या दुर्दशेविरोधात सुरू झालेल्या आमरण उपोषणाला यश मिळाले असून, उल्हासनगर महानगरपालिकेने मागण्या मान्य करून शुक्रवारी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी दोन वर्षे सहन केलेल्या या समस्येला ओमी कलानी यांच्या मध्यस्थते मुळे शेवटचा टिंब लागला आहे.
गुरुवारी सुरू झालेल्या आमरण उपोषणात शिवाजी रगडे, गजानन शेळके, फिरोज खान यांनी नेतृत्व केले. प्रशासनाने ठेकेदारांना काम पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले. रस्त्याच्या दुरुस्तीचे काम शुक्रवारी सकाळी प्रत्यक्ष सुरू झाले असून, शाळा सुरू होण्यापूर्वी मूलभूत सोयी निर्माण करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

रस्ता मोठा असावा यावर आजही सर्व ग्रामस्थ ठाम आहोत. परंतु तात्पुरता तरी रस्ता येण्या जाण्यासाठी असावा अशी विद्यार्थी पालक व ग्रामस्थांची देखील मागणी आहे ती पूर्ण झाली असून आज कामाला सुरुवात झाली. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. हा नागरिकांचा विजय आहे. आम्ही भ्रष्टाचार आणि प्रशासकीय उदासीनतेविरोधात ठाम उभे राहिलो आणि यशस्वी झालो असे मत शिवाजी रगडे यांनी व्यक्त केले.
दोन वर्षे अर्धवट पडलेल्या या रस्त्यामुळे शाळेतील हजारो विद्यार्थी आणि नागरिकांना अडचणी सहन कराव्या लागत होत्या. ठेकेदाराला बिल अदा केले असूनही काम पूर्ण न झाल्याने भ्रष्टाचाराची चर्चा होत होती. या आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते महिला युवक ग्रामस्थ यांचे मनपूर्वक आभार शिवाजी रगडे यांनी व्यक्त केले आहे.





























