मुंबई (प्रमोद दळवी यांसकडून ):- मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (शिंदे)पक्षाचे प्रमुख , राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अचानक भेटीमुळे केवळ राज्याच्या राजकारणातच नाही तर मनसेत पक्षांतर्गत खळबळ माजली आहे. विधानसभा निवडणुकीत राजपुत्र अमित ठाकरे, वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर व अन्य मनसे उमेदवारांच्या धक्कादायक पराभवाला कारण ठरलेल्या शिंदेसेनेविरुध्द मनसैनिक संतप्त असतानाच राज – शिंदे भेट झाल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या मंगळवारी राज ठाकरे यांची भेट घेतली , राज ठाकरे यांच्या शिवाजी पार्क येथील शिवतीर्थ निवासस्थानी ही स्नेहभोजन भेट झाली. सदर भेट ही निव्वळ सदिच्छा भेट होती , त्यात काहीही राजकीय चर्चा झाली नाही, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला . मात्र या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे – फडणवीस मतभेद वाढत चाललेत. शिंदेंच्या मुख्यमंत्री काळात घेतलेल्या अनेक मोठ्या निर्णयांना स्थगिती देण्याचा, समीक्षा करण्याचा सपाटा आता मुख्यमंत्री फडणवीस यांनी लावला आहे. येत्या काही महिन्यात महानगरपालिका निवडणूक होणार असून त्यासाठी शिंदेसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांत चढाओढ लागली आहे. शिंदेसेनेने जोरदार प्रयत्न चालवले आहेत. एकनाथ शिंदे हे भाजपला डोईजड झाल्याची अस्वस्थता भाजपात आहे. त्यामुळे शिंदेचे पंख कापले जात आहेत. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांच्या निवडणूक स्पेशल युतीची शक्यता पडताळून पाहण्यासाठी ही भेट असावी, पण या भेटीमुळे सर्वाधिक उंचावल्यात त्या मनसैनिक आणि मनसे नेत्यांच्या भुवया.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार जिंकला नाही, राज ठाकरे यांचे पुत्र अमित, ज्येठ नेते बाळा नांदगावकर , संदीप देशपांडे व अन्य सर्व मनसे उमेदवार पराभूत झाले. या पराभवाच्या मागे एकनाथ शिंदेंच्या पक्षाची निती असल्याचे दिसून आले.मागच्या विधानसभेत एकमेव मनसे आमदार असलेले कल्याणचे राजू पाटीलही यावेळी हरले. तिथे तर शिंदेसेनेच्या उमेदवाराने त्यांचा थेट पराभव केला. यामुळे मनसे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप आहे. राज ठाकरे यांनी मनसेच्या पराभवाचे खापर मतदान मशीनवर जाहीरपणे फोडले असले तरी मनसेत अंतर्गत याबाबतचा संताप कायम आहे.या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची अचानक भेट झाल्याने हे नक्की काय चालले आहे ? असा संभ्रम मनसे कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे






























