उल्हासनगर दि १२ ( प्रमोद दळवी ) : नुकताच उल्हासनगर मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाचे उल्हासनगर शहर प्रमुख कैलास तेजी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याची घटना ताजी असताना आता मनसेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन कदम यांच्यासह उल्हासनगरातील मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केल्याने या भव्य इनकमिंगमुळे शिवसेनेची ताकद आणखीन मजबूत झाली आहे. आगामी काळात जनतेच्या विश्वासाला न्याय देत विकासाची गती अधिक वेगाने पुढे नेण्याचा संकल्प शिवसेनेने केला आहे.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवत आणि जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली व गटनेता अरुण आशान यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगरमध्ये शिवसेनेत मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा अभूतपूर्व पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते मनसेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सचिन कदम यांच्यासह,शैलेश पांढव( मनसे उल्हासनगर शहर उपाध्यक्ष ), दीपक सावंत (विभाग अध्यक्ष ), उपेंद्र परब (उपविभाग अध्यक्ष),मोहित बेहरानी (उपविभाग अध्यक्ष),नीलेश गुरव (उपविभाग अध्यक्ष ),हेमंत शिंदे ( शाखा अध्यक्ष ),अथर्व शिंदे (शाखा अध्यक्ष),लक्ष्मीकांत गुप्ता ( शाखा अध्यक्ष),ज्ञानेश्वर सावळे ( शाखा अध्यक्ष ),वैभव भोसले ( उपशाखा अध्यक्ष ) या सर्वांचा शिवसेनेत पक्षप्रवेश करण्यात आला. या प्रवेशामुळे स्थानिक राजकारणात नवे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या सर्वांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेत जनसेवा आणि विकासाच्या वाटचालीत सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला आहे . त्यावेळी नगरसेवक चंद्रशेखर यादव, सौ. साक्षी संदीप सुर्वे, विभागप्रमुख संदीप सुर्वे, शाखाप्रमुख परेश मलबारी व पदाधिकारी उपस्थित होते. या भव्य इनकमिंगमुळे शिवसेनेची ताकद आणखी वाढली असून, आगामी काळात जनतेच्या विश्वासाला न्याय देत विकासाची गती अधिक वेगाने पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
सचिन कदम यांनी सांगितले निवडणुकी दरम्यान, मतदारांना आम्ही शब्द दिला होता. आम्ही प्रभागाचा विकास करणार आणि आमच्या शब्दावर विश्वास ठेवून मतदारांनी आम्हाला भर भरून मतदान केले. परंतु काही मतांच्या फरकाने आमचा पराभव झाला. परत निवडणुकी करिता, मतदारांना पाच वर्षे वाट पाहावी लागणार आहे. पण प्रभागाचा विकासाला का वाट पाहावी लागावी. मतदारांना दिलेला शब्द पूर्ण करता यावा, प्रभागाचा विकास व्हावा यांकरिता मी व माझ्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. असे यांनी सांगितले.





























