ठाणे दि. ७ ( प्रमोद दळवी ) : ठाणे जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून समाधानकारक पाऊस सुरू असून नद्या आणि धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यात सरासरी ८३८ मिमी पावसाची नोंद झाली असून, सर्वाधिक पाऊस ठाणे तालुक्यात झाला आहे. दरम्यान, ठाणे जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या बारवी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा वाढून ३६ टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे आगामी काळात पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने दिलासादायक परिस्थिती निर्माण होत असल्याचे चित्र आहे.
अहवालानुसार, ठाणे तालुक्यात सर्वाधिक १९६ मिमी एकूण पर्जन्यमान नोंदविण्यात आले असून त्यानंतर भिवंडीमध्ये ८२७ मिमी, उल्हासनगरमध्ये ७१२ मिमी, अंबरनाथमध्ये ८६९ मिमी, कल्याणमध्ये ६५५ मिमी, मुरबाडमध्ये ८४३ मिमी आणि शहापूरमध्ये ६३७ मिमी एकूण पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील एकूण सरासरी पर्जन्यमान ८३८.६३ मिमी इतके झाले असून, ते वार्षिक सरासरीच्या ३१.०६ टक्के आहे.
उल्हास नदीची पाणीपातळी वाढली; मात्र सध्या धोका कमी
सततच्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. मात्र काल रात्रीपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने नदी अद्याप इशारा पातळीच्या खाली वाहत असल्याने सध्या तातडीचा पूरधोका नसल्याचे दिसत आहे.
नोंदविण्यात आलेल्या पाणीपातळ्या पुढीलप्रमाणे आहेत:
- मोहने येथे उल्हास नदी – ८.८० मीटर
- जांभुळपाडा येथे उल्हास नदी – १२.७० मीटर
- बदलापूर येथे उल्हास नदी – १५.३० मीटर
- कल्याणजवळील टिटवाळा येथे काळू नदी – १०१.७० मीटर
- शहापूर तालुक्यातील भातसा नदी – ३३.२० मीटर
या सर्व ठिकाणी नदीची पाणीपातळी अद्याप इशारा पातळीच्या खाली असून परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र पुढील पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नदीपात्रांवर सतत लक्ष ठेवले जात आहे. आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. अद्याप धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नसली, तरी पावसाचा जोर कायम राहिल्यास ती लवकरच भरू शकतात.
धरणनिहाय सध्याचा पाणीसाठा:
- बारवी धरण – ३६ %
- भातसा धरण – ४२.५४%
- तानसा धरण – ४२.८५%
- मोडकसागर धरण – ५२.२२%
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी आजही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला आहे. नागरिकांनी नदीकाठ, धबधबे आणि सखल भागात जाणे टाळावे तसेच प्रशासनाने जारी केलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





























