ठाणे दि.१६ : ज्ञानगंगा एज्युकेशन ट्रस्टच्या बी.एड. महाविद्यालयात नुकताच महाविद्यालयाच्या डीजीईटी सभागृहात वार्षिक स्नेहसंमेलन व निरोप समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. विंदा मंजरमकर उपस्थित होत्या. तसेच डीजीईटी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. भाविका करकेरा, डीजीईटीच्या सीओओ वंदना शर्मा, पीआरओ श्री. अनिल आठवले, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत टेकाडे तसेच नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती शशिकला थोटा यांनीही उपस्थिती दर्शविली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथम व द्वितीय वर्ष बी.एड. विद्यार्थ्यांनी प्रभावीपणे केले. सहाय्यक प्राध्यापक सुरभी सोना यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. त्यानंतर महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ. सविता उपासनी यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या दोन वर्षांच्या बी.एड. प्रवासातील विविध उपक्रमांमध्ये — सांस्कृतिक, क्रीडा व DLLE — सहभागाबद्दल प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. हा समारंभ सहाय्यक प्राध्यापक सुरभी सोना, डॉ. कविता कांबळे व सहाय्यक प्राध्यापक रचना दास यांच्या हस्ते पार पडला. यानंतर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मनं जिंकली.दुपारच्या अल्पोपहारानंतर निरोप समारंभास सुरुवात झाली. या सत्रासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल, ठाणे यांच्या प्राचार्या डॉ. निकिता कोठारी उपस्थित होत्या. त्यांचा सत्कार प्राचार्या सौ. सविता उपासनी यांच्या हस्ते करण्यात आला.
डॉ. निकिता कोठारी यांच्या उपस्थितीत विशेष पारितोषिके व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी सहाय्यक प्राध्यापक प्रतिभा कांबळी, रचना दास व सुरभी सोना तसेच इतर प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्या डॉ. विंदा मंजरमकर व डॉ. निकिता कोठारी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना अनमोल मार्गदर्शन केले.निरोप समारंभात प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या दोन वर्षांच्या शैक्षणिक प्रवासाचा आढावा घेत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनीही आपल्या आठवणी व अनुभव व्यक्त करत भावनिक वातावरण निर्माण केले.कार्यक्रमाचा समारोप प्रथम व द्वितीय वर्ष विद्यार्थ्यांच्या समूह छायाचित्रणाने झाला. शेवटी आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.





























