उल्हासनगर दि ५ ( प्रमोद दळवी ) : ५ जून रोजी असलेल्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण दिनानिमित्त, उल्हासनगर महानगरपालिकेच्या उद्यान विभाग, पर्यावरण विभाग आणि वृक्ष प्राधिकरण समितीने शहरातील विविध उद्याने आणि सार्वजनिक ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

हा कार्यक्रम उल्हासनगर महानगरपालिका मुख्यालय, साधू वासवानी गार्डन (गोल मैदान), राजीव गांधी गार्डन (सपना गार्डन) आणि इतर उद्यानांमध्ये आयोजित करण्यात आला होता. पर्यावरण संरक्षणाविषयी जनजागृती करणे आणि अधिक वृक्षारोपणास प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
याप्रसंगी, भारतीय जनता पक्षाचे उल्हासनगर जिल्हाध्यक्ष राजेश वधरिया, शिवसेना पक्षाच्या उल्हासनगर येथील वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्या श्रीमती कविता मनोज लासी, तसेच उल्हासनगर महानगरपालिकेच्या पर्यावरण विभाग आणि उद्यान विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला आणि नागरिकांना शक्य तितकी झाडे लावण्याचे व त्यांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले. “पर्यावरणासाठी एक झाड, उज्ज्वल भविष्यासाठी एक पाऊल” या संदेशासह हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.





























