Homeशहरऑपरेशन टायगर फत्ते: चौकार नाही, थेट षटकार : सहा खासदारांच्या प्रवेशाने शिंदेंची...

ऑपरेशन टायगर फत्ते: चौकार नाही, थेट षटकार : सहा खासदारांच्या प्रवेशाने शिंदेंची शिवसेना आणखी भक्कम

  • २०२९ साली सहाच्या सहा खासदार पुन्हा निवडून येणार
  • बाळासाहेबांच्या विचारांसाठी सहा खासदारांचा शिंदेंच्या नेतृत्वावर विश्वास

मुंबई दि.२२: ४० आमदारांपासून सुरू झालेल्या २०२२ च्या राजकीय उठावानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला मिळणारा पाठिंबा सातत्याने वाढत असल्याचे चित्र सोमवारी पुन्हा एकदा स्पष्ट झाले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा विद्यमान खासदारांनी शिवसेनेत प्रवेश करत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. “आता एक नाही तर सहा टायगर आमच्यासोबत आहेत. चौकार नाही, षटकार मारला आहे,” असे सांगत शिंदे यांनी हा प्रवेश बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या विजयाचा आणि शिवसेनेच्या वाढत्या ताकदीचा पुरावा असल्याचा दावा केला.

यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडलेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात परभणीचे तीन वेळा निवडून आलेले खासदार संजय (बंडू) जाधव, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर, ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील, यवतमाळ-वाशीमचे खासदार संजय देशमुख आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

या वेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम, गजानन कीर्तिकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री भरत गोगावले, तसेच पक्षाचे अनेक मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. सहा खासदारांचे स्वागत करताना शिंदे म्हणाले की, २२ जून २०२२ रोजी शिवसेना, धनुष्यबाण आणि बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा वाचवण्यासाठी सुरू झालेल्या लढ्याचा हा दुसरा टप्पा आहे. सुरुवातीला ४० आमदार सोबत होते, तर आज सहा खासदारांनी शिवसेनेत प्रवेश करून त्या लढ्याला नवे बळ दिले आहे. “आता एक नाही तर सहा टायगर आपल्या सोबत आहेत,” असे ते म्हणाले.

बाळासाहेबांच्या विचारांवर श्रद्धा असलेले शिवसैनिक अखेर शिवसेनेतच एकवटतात, असे सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, “जिथे शिवसेनेचे विचार, तिथे शिवसैनिक. त्यामुळेच हे सहा खासदार आज बाळासाहेबांच्या शिवसेनेत आले आहेत.” या सर्व खासदारांनी मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी आणि जनतेशी चर्चा करून हा निर्णय घेतल्याचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, विकास, कार्यकर्त्यांचा सन्मान आणि जनतेची कामे हा त्यांचा प्रमुख विचार होता. काहींनी टीका केली, आरोप केले, परंतु त्यांनी जनतेच्या हिताला प्राधान्य दिले.

प्रवेश केलेल्या प्रत्येक खासदाराच्या कार्यशैलीचे कौतुक करताना शिंदे यांनी संजय बंडू जाधव यांना जमिनीशी नाळ जोडून काम करणारे कार्यकर्ते, संजय दिना पाटील यांना बेधडक आणि सामान्य माणसांचा कैवारी, तर ओमराजे निंबाळकर यांना “रिअल स्टार” असे संबोधले. संजय देशमुख यांच्या कामाचे कौतुक करत त्यांनी त्यांना आणखी मोठ्या प्रमाणावर काम करण्यासाठी शिवसेना व्यासपीठ उपलब्ध करून देईल, असे सांगितले. नागेश पाटील आष्टीकर यांच्या बिंदास स्वभावाचा उल्लेख करताना, त्यांच्या वाटेला जाणाऱ्यांना त्यांची ताकद समजेल, असे ते म्हणाले. भाऊसाहेब वाकचौरे यांना “गावातही वाघ आणि राजकारणातही वाघ” असे संबोधत त्यांनी त्यांचे विशेष स्वागत केले.

“हे खासदार कोणत्याही वैयक्तिक स्वार्थासाठी आलेले नाहीत. ते मतदारसंघाच्या विकासासाठी, कार्यकर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शिवसेनेत आले आहेत,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले. ओमराजे निंबाळकर यांच्या कुटुंबावर आलेल्या कठीण प्रसंगाचा संदर्भ देत त्यांनी, “शिवसेना आणि एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत,” असा विश्वास दिला.

२०२२ च्या निर्णयावर टीका करणाऱ्यांना उत्तर देताना शिंदे म्हणाले की, त्या वेळी अनेकांनी एकही आमदार निवडून येणार नसल्याचा दावा केला होता. मात्र जनतेने त्यांचा निर्णय स्वीकारला आणि ६० आमदार निवडून आले. “जर आमचे आमदार निवडून आले नसते तर मी राजीनामा देऊन गावी शेती करायला गेलो असतो,” अशी आठवणही त्यांनी करून दिली.

अडीच वर्षांच्या काळात राज्यात विकासाला गती मिळाल्याचा दावा करत त्यांनी लाडकी बहीण योजना, शेतकरी हिताच्या योजना आणि विविध विकासकामांचा उल्लेख केला. जनतेने आणि लोकप्रतिनिधींनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच शिवसेना चांदा ते बांदा विस्तारत असल्याचे त्यांनी सांगितले. महापौर, नगरसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष, सरपंच आणि विविध स्तरांवरील लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात शिवसेनेत सहभागी होत असल्याचा उल्लेख करत त्यांनी पक्षाचा वाढता विस्तार अधोरेखित केला.

बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळातील विचारधारात्मक भूमिकेची आठवण करून देत शिंदे म्हणाले की, शिवसेनेची भूमिका स्पष्ट आणि स्वच्छ आहे. काहींनी विचारधारा सोडली म्हणून महाराष्ट्राने त्यांना नाकारले. महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि जनतेच्या अपेक्षांना साजेसा विकासाचा मार्ग आम्ही स्वीकारला आहे. असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

“दिलेला शब्द पाळणे हीच आमची सर्वात मोठी ताकद आहे,” असे सांगत त्यांनी नव्याने प्रवेश केलेल्या खासदारांच्या मतदारसंघातील प्रकल्प, विकासकामे आणि प्रश्न प्राधान्याने सोडवले जातील, अशी ग्वाही दिली. “हा एकनाथ शिंदे यांचा शब्द आहे,” असे ते म्हणाले.

स्वतःला आजही कार्यकर्ता मानत असल्याचे सांगताना शिंदे म्हणाले की, शिवसेनेत कोणी मालक नाही. येथे सर्वजण सहकारी आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान राखला जाईल आणि कोणाचाही अनादर होणार नाही. हे डबल इंजिन सरकार असल्याने केंद्र आणि राज्याच्या समन्वयातून विकासकामांना अधिक गती मिळेल, असे सांगत त्यांनी नव्या खासदारांच्या प्रश्नांसाठी स्वतंत्र बैठक घेण्याची घोषणाही केली.

“सर्वांनी मिळून शिवसेना अधिक बळकट करायची आहे. गावागावात आणि घराघरात शिवसेना पोहोचवायची आहे. ही सगळी ताकद एकत्र आल्यावर महाराष्ट्रात आणखी मजबूत शिवसेना उभी राहील,” असे आवाहन त्यांनी केले. “ऑपरेशन टायगर”बाबत माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चेचा संदर्भ देत शिंदे म्हणाले, “हे नाव पत्रकारांनी दिले असले तरी आम्ही कोणतेही ऑपरेशन अर्धवट करत नाही. आम्ही ऑपरेशन फुलप्रूफ करतो. आज सहाही खासदार शिवसेनेत सामील झाले आहेत आणि त्यामुळे ऑपरेशन टायगर पूर्णपणे यशस्वी झाले आहे.”

संपूर्ण प्रक्रिया कायदा, संविधान आणि संसदीय परंपरांच्या चौकटीत पार पडल्याचे स्पष्ट करत त्यांनी विश्वास व्यक्त केला की, आज शिवसेनेत आलेले हे सर्व खासदार भविष्यात धनुष्यबाण चिन्हावरच निवडून येतील. दरम्यान, कार्यक्रमात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचाही विशेष गौरव करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिवसेना शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन

उल्हासनगर दि. १७ ( प्रमोद दळवी )  : शिवसेना शहरप्रमुख तथा ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांच्या वाढदिवसानिमित्त भुल्लर परिवाराच्या वतीने भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे...

उल्हासनगरमध्ये दिवसाढवळ्या नशेखोर टोळीचा धुडगूस; ३ कारसह मालवाहू रिक्षाची तोडफोड

उल्हासनगर दि. १७ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर-३ मधील सेक्शन १७ येथील बाबा थरिया सिंगजी  दरबार जवळ असलेल्या उद्यान परिसरात सोमवारी सायंकाळी सुमारे...

खरगे यांच्या सभास्थळाच्या ‘शुद्धीकरणा’चा उल्हासनगर काँग्रेसकडून तीव्र निषेध; आंबेडकर चौकात निषेध मोर्चा व सत्याग्रह

उल्हासनगर दि. १७ ( प्रमोद दळवी )  : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे झालेल्या सभेनंतर काही उजव्या...

लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओमध्ये उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा; देशभक्तीपर गीतांतून हुतात्म्यांना मानवंदना

मुंबई दि. १७ : "भारतमातेचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येक भारतीयाने जात-धर्म विसरून एकत्र येणे हीच काळाची गरज आहे," असा संदेश देत, भारतीय स्वातंत्र्याला ८० वर्षे...

बुक ऑफ लाइफ चर्चमध्ये रक्तदान शिबिर : चर्च सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग

नाशिक दि. १७ ( संदीप गायकवाड  )  : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नाशिक येथील बुक ऑफ लाइफ चर्चच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. मानवसेवा...

शिवसेना शहरप्रमुख राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन

उल्हासनगर दि. १७ ( प्रमोद दळवी )  : शिवसेना शहरप्रमुख तथा ज्येष्ठ नगरसेवक राजेंद्रसिंह भुल्लर (महाराज) यांच्या वाढदिवसानिमित्त भुल्लर परिवाराच्या वतीने भव्य अभिष्टचिंतन सोहळ्याचे...

उल्हासनगरमध्ये दिवसाढवळ्या नशेखोर टोळीचा धुडगूस; ३ कारसह मालवाहू रिक्षाची तोडफोड

उल्हासनगर दि. १७ ( प्रमोद दळवी )  : उल्हासनगर-३ मधील सेक्शन १७ येथील बाबा थरिया सिंगजी  दरबार जवळ असलेल्या उद्यान परिसरात सोमवारी सायंकाळी सुमारे...

खरगे यांच्या सभास्थळाच्या ‘शुद्धीकरणा’चा उल्हासनगर काँग्रेसकडून तीव्र निषेध; आंबेडकर चौकात निषेध मोर्चा व सत्याग्रह

उल्हासनगर दि. १७ ( प्रमोद दळवी )  : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे झालेल्या सभेनंतर काही उजव्या...

लक्ष्मी म्युझिकल स्टुडिओमध्ये उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा; देशभक्तीपर गीतांतून हुतात्म्यांना मानवंदना

मुंबई दि. १७ : "भारतमातेचे ऋण फेडण्यासाठी प्रत्येक भारतीयाने जात-धर्म विसरून एकत्र येणे हीच काळाची गरज आहे," असा संदेश देत, भारतीय स्वातंत्र्याला ८० वर्षे...

बुक ऑफ लाइफ चर्चमध्ये रक्तदान शिबिर : चर्च सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग

नाशिक दि. १७ ( संदीप गायकवाड  )  : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून नाशिक येथील बुक ऑफ लाइफ चर्चच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. मानवसेवा...
error: Content is protected !!