उल्हासनगर दि. १२ ( प्रमोद दळवी ) : युवासेना कल्याण लोकसभा सचिव हरजिंदर सिंह भुल्लर (विक्की) यांनी उल्हासनगर शहरातील आरओ व पाणी जार प्रकल्पांची सखोल तपासणी करून बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनासोबत हरजिंदर सिंह भुल्लर (विक्की) यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे उल्हासनगर शहरातील काही दुकानदार, कंपन्या आणि आरओ व पाणी जार प्रकल्पांची यादीही सादर केली असून, संबंधित प्रकल्पांची तातडीने तपासणी करण्याची विनंती केली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, उन्हाळ्याच्या काळात पिण्याच्या पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असताना उल्हासनगरातील अनेक आरओ व पाणी जार प्रकल्पांकडे FDA ची वैध नोंदणी, आवश्यक परवाने तसेच गुणवत्ता तपासणीसंदर्भातील कागदपत्रे नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने प्राप्त होत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असून, निकृष्ट किंवा दूषित पाणी पुरवठा झाल्यास विविध संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो. शुद्ध, सुरक्षित आणि दर्जेदार पिण्याचे पाणी पुरविणे ही प्रत्येक प्रकल्प चालकाची जबाबदारी असल्याचे नमूद करत हरजिंदर सिंह भुल्लर (विक्की) यांनी अन्न व औषध प्रशासनाने शहरातील सर्व आरओ व पाणी जार प्रकल्पांची विशेष तपासणी मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच प्रत्येक प्रकल्पातून पाण्याचे नमुने संकलित करून अधिकृत प्रयोगशाळेत त्यांची गुणवत्ता तपासावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, असेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
हरजिंदर सिंह भुल्लर (विक्की) यांनी केलेल्या प्रमुख मागण्या अशा आहेत १) उल्हासनगर शहरातील सर्व RO व पाणी जार प्रकल्पांची विशेष तपासणी करण्यात यावी. २) FDA नोंदणी, आवश्यक परवाने व इतर कागदपत्रांची पडताळणी करण्यात यावी. ३) सर्व प्रकल्पांमधून पाण्याचे नमुने घेऊन अधिकृत प्रयोगशाळेत गुणवत्ता चाचणी करण्यात यावी.४) बेकायदेशीर अथवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. ५) शहरातील एकूण आरओ व पाणी जार प्रकल्पांची संख्या आणि त्यापैकी वैध परवाना असलेल्या प्रकल्पांची माहिती सार्वजनिक करण्यात यावी.६) नागरिकांना सुरक्षित, शुद्ध व दर्जेदार पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्यात याव्यात.
यावेळी हरजिंदर सिंह भुल्लर (विक्की) म्हणाले, “पिण्याच्या पाण्याचा विषय हा नागरिकांच्या आरोग्याशी थेट संबंधित आहे. त्यामुळे या बाबतीत कोणतीही तडजोड होऊ नये. FDA प्रशासनाने तातडीने विशेष मोहीम राबवून सर्व आरओ व पाणी जार प्रकल्पांची तपासणी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी.” दरम्यान, या निवेदनामुळे उल्हासनगरातील आरओ व पाणी जार व्यवसायातील कथित नियमबाह्य कारभाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, FDA प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि पुढील काळात कोणती कारवाई करते, याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.





























