उल्हासनगर दि २ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून कामाला असलेल्या एका कर्मचाऱ्यावर सात ते आठ जणांचे टोळीने तलवारीने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची खळबजण घटना उल्हासनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर २ परिसरातील भैय्यासाहेब आंबेडकरनगर परिसरात राहणारा पवन ढकोलिया हा उल्हासनगर महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करतो. तो दुपारच्या सुमारास जेवणासाठी घरी आला होता. जेवण करून पुन्हा कामावर जात असताना सात ते आठ जणांच्या टोळीने त्याला गंभीरित्या प्रथम मारहाण करून त्याच्या डोक्यावर तलवारीने हल्ला केला. त्या हल्ल्यात पवन हा गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पवन याच्यावर ज्या टोळीने हल्ला केला त्या हल्लेखोरांची नावे पवन यांनी पोलिसांना दिली आहे. याशिवाय ज्या टोळीने त्याच्यावर हल्ला केला ती आपल्या परिसरात राहणारे असल्याची त्यांनी सांगितले आहे. पवन यांनी दिलेल्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात सात ते आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. या घटनेमुळे उल्हासनगरात एकच खळबळ उडाली असून शहरात दहशत निर्माण करणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी सर्वत्र केली जात आहे. त्या टोळीने पवन याच्यावर कोणत्या कारणावरून हल्ला केला हा सर्व प्रकार पोलिसांच्या तपासात उघडकीस येणार आहे.

टोळीने पवन याच्या डोक्यावर १५ ते २० तलवारीने वार केले आहेत. याशिवाय त्याच्या डोक्यावर दगडी मारण्यात आले असून त्याचा पाय देखील फ्रॅक्चर करण्यात आला आहे. या टोळीने विविध हत्याराने पवन याच्यावर हल्ला केला आहे. हा प्रकार घडत होता तेव्हा परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केल्यावर हल्लेखोर त्या ठिकाणी पळून गेले त्यामुळे पवन हा बचावला. परिसरात वाढणाऱ्या गुन्हेगारीला पोलिसांनी आळा घालने गरजेचे आहे असे मत नागरिक व्यक्त करत आहेत.





























