- जीर्ण झालेल्या झाडांची योग्य विल्हेवाट लावणे बाबत संबंधित विभागांना मनसेचे निवेदन.
- भविष्यात कोणती दुर्घटना घडल्यास संबंधित विभाग सर्वस्वी जबाबदार.
उल्हासनगर दि ३० : प्रभाग समिती क्रमांक १, पॅनल क्रमांक १ येथील एम.आय. डी.सी रस्त्यावरील सर्वच झाडे जीर्ण आणि कमवकुत झालेली आहेत सदर झाडे ही कधीही मोडून पडू शकतात त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांवर,लोकांच्या अंगावर अशी झाडे कोसळून दुर्घटना होऊन जीवित किंवा वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने थैमान घातलेले आहे,धोकादायक ईमारती, वृक्ष कोसळण्याचे सत्र सुरू झाले आहे,आपल्या शेजारच्या अंबरनाथ शहरात तर एक व्यक्ती लघवी करत असतांना विजेचा धक्का लागून मृत्यू मुखी पडला त्यानंतर त्या घटनेला जबाबदार धरून संबंधित विभागाचा अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा देखील नोंद करण्यात आलेला आहे.

आपल्या उल्हासनगर शहरात ही अनेक ठिकाणी विजवाहिन्यांच्या खाली झाडे असल्याने पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वादळ,जोराचा वारा यामुळे त्या झाडांच्या फांद्या वीज वाहिन्यांमध्ये घुसून विजेच्या तारांमध्ये आप-आपसांमध्ये घर्षण होऊन शॉकसर्किट झाल्याने तासंतास विजेचा खोळंबा होतो, झाडामध्ये करंट पसरल्याने जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भविष्यातील अप्रिय घटना टाळायच्या असतील तर संबंधित अधिकाऱ्यांनी मुख्य रस्त्यांवरील, गल्ल्यांमधील विद्युतवाहिन्यांच्या जवळून तसेच विद्युत वाहिन्यांच्या खाली असलेल्या झाडांच्या फांद्या तात्काळ छाटून घेण्याचे संबंधितांना आदेश द्यावेत. शिवनेरी नगर, तानाजीनगर, एम.आय.डी.सी रस्त्यावरील अनेक लोकांनी या झाडांच्या फांद्या छाटण्या बाबत,या जीर्ण झालेल्या झाडांची विल्हेवाट लावण्याबाबत उल्हासनगर महानगर पालिकेच्या संबंधित विभागांकडे वारंवार पाठपुरावा केलेला आहे,परंतु सर्व काही कायदेशीर कारवाई झालेली असतांना,झाडांवर कारवाईच्या नाहरकतीच्या नोटीस प्रसिद्ध करून झाल्यानंतर आणि झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी तसेच जीर्ण झालेल्या झाडांची विल्हेवाट लावण्यासाठी कोणाचीही हरकत नसतांना सुद्धा या धोकादायक, जीवघेण्या जीर्ण झालेल्या झाडांवर उल्हासनगर महानगर पालिका प्रशासनाच्या वतीने निर्णायक कारवाई केली जात नाही.

पावसाळ्याचे दिवस असल्याने वादळ, वारा यामुळे आपल्या शहरात तसेच आजू-बाजूंच्या शहरांमध्ये झाडे पडून दुर्घटना घडत आहेत. एम.आय.डी.सी रस्त्यावरील या जीर्ण झालेल्या झाडांमुळे ही भयंकर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आणि उल्हासनगर महानगर पालिका प्रशासनाने तात्काळ या महत्वपूर्ण विषयावर तोडगा काढावा अन्यथा कोणतीही अप्रिय घटना घडल्यास संबंधीत विभागाचे अधिकारी सदर घटनेला सर्वस्वी जबाबदार असतील अश्या आशयाचे निवेदन मनसे तर्फे संबंधित विभागांना देण्यात आले. यावेळी मनसेचे महानगर संघटक मैनुद्दीन शेख, वाहतूक सेनेचे शहर संघटक काळु थोरात, विभाग अध्यक्ष कैलास घोरपडे, कैलास वाघ, शाखा अध्यक्ष संजय नार्वेकर, जगदीश माने, मनोज चिंचनकर उपस्थित होते.





























