अति उकाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा
( प्रमोद दळवी )
उल्हासनगर दि. ६ : महाराष्ट्र मध्ये सध्या पडत असलेल्या अति उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यात महाराष्ट्र मधील काही भागात अवकाळी पाऊस देखील पडत आहे. त्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान देखील होत आहे. गेल्या आठवड्याभरात अति उष्णता मुळे नागरिक दुपारच्या वेळेस घराबाहेर देखील पडत नव्हते. गेल्या तीन चार दिवसापासून वातावरणात बदलाव निर्माण झाला होता.

अखेर या उष्णतेपासून मंगळवारी रात्री साडे नऊच्या सुमारास नागरिकांना दिलासा मिळाला. ठाणे जिल्ह्यातील काही भागात या पावसाने अचानक जोरदार हजेरी लावली. उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर सह मुरबाड मध्ये देखील मुसळधार पाऊस पडत होता. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. या पावसामुळे काही ठिकाणी विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी देखील साचले होते. पडलेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला. अचानक अवकाळी पडलेल्या पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील काही भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते. तर उल्हासनगर मध्ये मोठ्या प्रमाणात रस्ते खणलेले असल्याने या पावसामुळे खड्ड्यात पाणी साचलेले पाहायला मिळाले. काही ठिकाणी रस्ते देखील पाण्याखाली गेल्याचे दिसत होते. सध्या उल्हासनगरतील रस्ते खड्डेमय झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यात अचानक पडलेल्या पावसामुळे खोदलेल्या रस्त्याच्या ठिकाणी चिखल निर्माण झाला आहे. अचानक पडलेल्या पावसामुळे गार हवा देखील सुटली होती. रात्री साडेदहापर्यंत काही ठिकाणी पाऊस सुरू होता. पडलेल्या पावसामुळे विद्युत पुरवठा देखील काही ठिकाणी खंडित झाला होता.





























