उल्हासनगर दि. १७ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर-३ मधील सेक्शन १७ येथील बाबा थरिया सिंगजी दरबार जवळ असलेल्या उद्यान परिसरात सोमवारी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास २ ते ३ नशेखोर तरुणांच्या टोळीने लोखंडी सळ्यांच्या सहाय्याने उभ्या वाहनांची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील रहिवासी, दुकानदार तसेच वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण अमली पदार्थांच्या आहारी गेलेले असल्याचे सांगितले जात असून त्यांनी दिवसाढवळ्या नागरिकांची वर्दळ असतानाच परिसरात उभ्या असलेल्या किमान तीन कार आणि एका मालवाहू रिक्षेची तोडफोड केली. विशेष म्हणजे हा प्रकार अनेक नागरिक, रहिवासी आणि दुकानदारांच्या उपस्थितीत घडला. मात्र, या परिसरात अशा प्रकारची गुंडगिरी वारंवार होत असल्याने भीतीपोटी कोणीही या तरुणांना रोखण्याचे धाडस केले नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

उद्यान परिसर बनला नशेखोरांचा अड्डा?
स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, बाबा थरिया सिंगजी दरबार जवळ असलेल्या या उद्यानात नियमित देखरेख नसल्याचा फायदा घेत काही अमली पदार्थ सेवन करणारे आणि मद्यपी तरुण येथे येत असतात. विशेषतः रात्रीच्या वेळी उद्यानाच्या आजूबाजूला कार, मालवाहू रिक्षा आणि इतर वाहने उभी असतात. या वाहनांच्या आडोशाला किंवा काही वेळा मालवाहू रिक्षांच्या आत बसून अमली पदार्थांचे सेवन केले जात असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. नशेत धुंद झाल्यानंतर हे तरुण परिसरात आरडाओरड, शिवीगाळ आणि गोंधळ घालत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे.
नागरिकांना धमकावणे, मारहाणीच्या घटनांचाही आरोप
या भागात ये-जा करणाऱ्या नागरिकांना तसेच स्थानिक रहिवाशांना काही नशेखोर तरुणांकडून धमकावले जाते आणि प्रसंगी मारहाणही केली जाते, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.“दिवसाढवळ्या सर्वांसमोर वाहनांची तोडफोड करण्यापर्यंत या टोळ्यांची मजल गेली असेल, तर परिस्थिती किती गंभीर आहे, याचा अंदाज येतो,” अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दिवसाढवळ्या लोखंडी सळ्यांनी वाहनांची तोडफोड करणाऱ्या या टोळीची घटना उल्हासनगर मध्यवर्ती (सेंट्रल) पोलीस ठाण्यासाठी धोक्याची घंटा आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी उल्हासनगर रेल्वे स्थानकाबाहेरील स्कायवॉक परिसरात अचानक कारवाई करत अमली पदार्थ सेवन करणारे तसेच मद्यपान करणाऱ्या व्यक्तींविरोधात मोहीम सुरू केली होती. मात्र, शहरातील इतर भागांमध्येही अशा प्रकारे नशेखोर आणि समाजकंटकांचा वावर वाढत असेल, तर पोलिसांनी केवळ एखाद्या ठिकाणी कारवाई न करता संशयित ठिकाणांवर सातत्याने गस्त, अचानक तपासणी आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
या घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून वाहनांची तोडफोड करणाऱ्या तरुणांचा शोध घ्यावा, अशी मागणी होत आहे. तसेच या परिसरात अमली पदार्थांचे सेवन किंवा विक्री होत असल्यास त्यामागील व्यक्तींचाही शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.दिवसाढवळ्या नागरिकांच्या डोळ्यादेखत वाहनांची तोडफोड करणाऱ्या या नशेखोर टोळीविरोधात सेंट्रल पोलीस ठाण्याचे प्रशासन आता किती कठोर कारवाई करते, तसेच या परिसरातील अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यक्ती आणि समाजकंटकांवर पोलिसांचा कितपत वचक निर्माण होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





























