अंबरनाथ दि.३० ( प्रमोद दळवी ) : अंबरनाथ शहरातील उड्डाणपुलावरील जीवघेण्या खड्ड्यांविरोधात नागरिकांचा संताप आता रस्त्यावर उतरला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमध्ये कागदी होड्या सोडत अनोख्या पद्धतीने आंदोलन करून अंबरनाथ नगरपालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली. अवघ्या तीन दिवसांपूर्वी करण्यात आलेली खड्डे बुजविण्याची दुरुस्ती या पावसातच उखडून गेल्याने वाहनचालक आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

उड्डाणपुलावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून अपघातांचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते प्रकाश नलावडे यांनी खड्ड्यांमध्ये कागदी होड्या सोडून प्रशासनाचे लक्ष वेधले. “अंबरनाथच्या विकासाची नाव इतकी बुडाली आहे की खड्ड्यात कागदी होडीदेखील तरंगत नाही,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. यावेळी आंदोलकांनी पालिका प्रशासनाच्या पावसाळी पाहणी दौऱ्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. वारंवार तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजविण्याऐवजी उड्डाणपुलाची कायमस्वरूपी आणि दर्जेदार दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश नलावडे म्हणाले की, अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागात अनेक शाळा असून दररोज शेकडो विद्यार्थी रिक्षांमधून प्रवास करतात. उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे अनेक वेळा विद्यार्थ्यांना धक्के बसतात, तर अपघातांचाही धोका निर्माण होतो. “कालच एका महिलेची तक्रार आली. खड्ड्यामुळे तिची अॅक्टिव्हा घसरून ती पडली आणि तिला दुखापत झाली. हे खड्डे अधिकाऱ्यांना दिसत नाहीत का? एखाद्याचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

आंदोलनात सहभागी झालेले अशोक सिन्नरप्पा यांनीही नगरपालिकेवर भ्रष्टाचाराचा आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली. “अंबरनाथच्या विकासाची नाचक्की झाली आहे. बाहेरचे लोक अंबरनाथचे धबधबे पाहायला येतात, पण आम्ही अंबरनाथकर स्वतःच्या शहरातील खड्डे पाहत आहोत. आम्ही कागदाच्या होड्या तयार केल्या, निदान त्या तरी पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमध्ये तरंगतील असे वाटले; मात्र त्या देखील तरंगत नाहीत. एवढा निकृष्ट दर्जाचा कारभार नगरपालिकेने केला आहे,” अशी टीका त्यांनी केली. यावेळी अशोक सिन्नरप्पा यांनी प्रशासनाला चार दिवसांचा अल्टिमेटम दिला. “चार दिवसांत उड्डाणपुलावरील रस्ता कायमस्वरूपी आणि दर्जेदार पद्धतीने दुरुस्त झाला नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांना ‘झेंडू बाम’च्या बाटल्या भेट देऊन आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,” असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, वारंवार होणाऱ्या तात्पुरत्या दुरुस्तीऐवजी उड्डाणपुलाची कायमस्वरूपी दुरुस्ती कधी होणार, याकडे अंबरनाथकरांचे लक्ष लागून राहिले आहे. नागरिकांनी प्रशासनाने तातडीने दखल घेऊन सुरक्षित आणि दर्जेदार रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली आहे.





























