उल्हासनगर दि ८ : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (Special Intensive Revision-SIR) सध्या युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत होणाऱ्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यासाठी बुधवारी उल्हासनगर महानगरपालिकेच्या महासभा सभागृहात एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मा. श्रीम. मनिषा आव्हाळे (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त धीरज चव्हाण, तहसीलदार श्रीम. कल्याणी कदम, सहा. आयुक्त (१) तथा जनसंपर्क अधिकारी अजय साबळे, नायब तहसिलदार कुमावत, सहा. आयुक्त गणेश शिंपी आणि सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षक व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित होते.

बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे आणि निर्देश :
कामाचा आढावा : मतदार याद्यांमधील प्रोजन्सी मॅपिंग, लोकसंख्या शास्त्रीयदृष्ट्या समान नोंदींची (DSE) पडताळणी, अस्पष्ट व मानवी नसलेल्या छायाचित्रांची (Blurred & Non-Human) शुद्धीकरणाची प्रक्रिया आणि ‘फोटो सिमिलर एन्ट्रीज’ (PSE) या कामांचा प्रत्यक्ष प्रगती अहवाल तपासण्यात आला.
दोन दिवसांची डेडलाईन : सर्व केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षणाचे उर्वरित काम पुढील दोन दिवसांत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करावे, असे सक्त निर्देश तहसीलदार श्रीम. कल्याणी कदम यांनी दिले.
घरोघरी भेटीवर भर : प्रोजन्सी मॅपिंगसाठी बीएलओनी प्रत्यक्ष घरोघरी भेट देऊन अचूक माहिती संकलित करावी. तसेच, पर्यवेक्षकांनी (Supervisors) बीएलओना तांत्रिक मदत करून कामाची टक्केवारी वाढवण्यावर भर द्यावा, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
ज्या बीएलओंची कामगिरी समाधानकारक नाही किंवा ज्यांच्या कामाची टक्केवारी अत्यंत कमी आहे, अशा कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही. “अशा कर्मचाऱ्यांवर तात्काळ एफआयआर (FIR) दाखल करण्यात येईल आणि तशी नोंद त्यांच्या सेवापुस्तकात (Service Book) केली जाईल,” अशी सक्त ताकीद अतिरिक्त आयुक्त धीरज चव्हाण यांनी बैठकीत दिली. सहा. आयुक्त (१) तथा जनसंपर्क अधिकारी अजय साबळे यांनी बैठकीचा समारोप करताना नमूद केले की, मतदार यादी अद्ययावत करण्याचे हे काम अत्यंत महत्त्वाचे राष्ट्रीय कर्तव्य आहे. सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी हे काम पूर्ण गांभीर्याने, सातत्याने आणि अचूकतेने पार पाडावे, असे आवाहन त्यांनी केले.





























