उल्हासनगर दि.८ : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळाच्या विरोधात नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी पैनल क्रमांक १२च्या एक प्रतिनिधिमंडळाने महावितरणला भेट दिली. या प्रतिनिधिमंडळात मा. नगरसेविका सविता तोरणे रगडे, प्रवक्ता शिवाजी रगडे, माजी नगरसेवक गजानन शेळके, फिरोज खान विभाग प्रमुख, दशरथ चौधरी उपविभाग प्रमुख, आदिनाथ पालवे शाखाप्रमुख, तानाजी माळी, टिओके युथ महासचिव विजय उबाळे, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष दुर्गेश पांडे यांचा समावेश होता.वाढते विद्युत बिल, सातत्याने खंडित होणारा विद्युत प्रवाह आणि नवीन विद्युत मीटर जोडण्यात येणाऱ्या अडचणींबाबत विविध तक्रारी नागरिकांकडून प्राप्त झाल्या होत्या. या संदर्भात प्रतिनिधिमंडळाने कार्यकारी अभियंता हरीश भराडे यांची भेट घेऊन निवेदन दिले आणि नागरिकांच्या तक्रारी सोडवण्याविषयी विनंती केली.
सम्राट अशोक नगर, आनंद नगर, संतोष नगर, रेणुका सोसायटी, आशीर्वाद सोसायटी आणि वडोलगाव या परिसरात जुने पोल बदलून नवीन पोल लावण्याचे काम प्रलंबित आहे. सकाळी पाण्याच्या वेळी सम्राट अशोक नगर, रेणुका सोसायटी आणि आशीर्वाद सोसायटी या ठिकाणी सातत्याने विद्युत प्रवाह खंडित होतो, ज्यामुळे नागरिकांना पाणी मिळत नाही. नागरिकांचे हजार ते पंधराशे दरम्यान येणारे बिल आता अडीच ते तीन हजाराच्या वर गेलेले आहे, याची कारणे शोधून तक्रारीचे निवारण लवकरात लवकर करावे अशी मागणी त्यावेळी निवेदनाद्वारे करणायत आली. कार्यकारी अभियंता हरीश भराडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन येणाऱ्या दहा-पंधरा दिवसांमध्ये परिसरात एक शिबिर लावून नागरिकांच्या बिलासंदर्भातील तक्रारी लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले. त्यांनी इतर मागण्या देखील सकारात्मकपणे लवकरात लवकर सोडवण्याचे आश्वासन दिले.





























