उल्हासनगर दि.२६ : सुभाष टेकडी परिसरातील नागरिकांनी अन्यायकारक प्रभाग रचनेविरोधात संताप व्यक्त केला आहे. आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ले मानल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकासह एकमेव खेळाचे मैदान आणि तब्बल ५००० मते पॅनेल क्रमांक १८ मधून जबरदस्तीने पॅनेल क्रमांक १३ मध्ये टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे लेखी निवेदन देऊन नागरिकांनी न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे.
सुभाष टेकडी हा परिसर ७० ते ८० टक्के बौद्ध समाजाचे वास्तव्य असलेला आहे. त्यामुळेच येथील प्रभाग आरक्षित ठेवला जात असे. मात्र २०१७ साली करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत काही स्वार्थी राजकीय मंडळींनी जाणूनबुजून चतुर्सीमेचा घोळ घालत, सुभाष टेकडीतील खेळाचे मैदान, डॉ. आंबेडकर चौक व बुद्ध कॉलनी, ब्लॉक लाईन ते भरतनगर, पंचशील नगर, साईबाबा नगर अशा परिसरातील तब्बल ५००० मते थेट प्रभाग १३ मध्ये टाकून मागासवर्गीय आरक्षण धोक्यात आणले, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
यामुळे परिसरातील लोकांचा मतदानाचा अधिकारही बाधित होत असून, दोन किलोमीटरवर असलेल्या मतदान केंद्रावर जाणे अवघड झाल्याने अनेक नागरिक मतदानापासून वंचित राहतात. परिणामी मतदानाची टक्केवारी घसरते आणि लोकशाही प्रक्रियेला धक्का बसतो, अशीही खंत व्यक्त केली गेली आहे. याविरोधात परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन हजारोंच्या संख्येने सह्या करून प्रभाग रचनेस विरोध दर्शविला आहे. अलीकडेच टाऊन हॉल येथे झालेल्या सुनावणीतही हरकती दाखल झाल्या आहेत. आता अंतिम निर्णय निवडणूक आयोगाकडून अपेक्षित आहे.
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हा आंबेडकरी चळवळीचा आत्मसन्मान आहे. त्याला वेगळ्या प्रभागात ढकलणे म्हणजे आमच्या अस्मितेवर गदा आणणे आहे. हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा आणि मैदानासह सर्व ५००० मते पुन्हा पॅनेल १८ मध्ये सामील करावीत,” अशी ठाम भूमिका आयु. वामदेव भोयर, आयु. सुबोध गोंडाणे, आयु. सुरेश जगताप, आयु. आखरिखत सव्वाखंडे, आयु. मिलींद मेश्राम, आयु. वंदना इंगळे यांच्यासह परिसरातील आंबेडकराईट नागरिकांनी घेतली आहे.





























