उल्हासनगर दि. २१ ( प्रमोद दळवी ) : वाढदिवस हा समाजोपयोगी उपक्रमातून साजरा करण्याचा संदेश देत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख आदिनाथ पालवे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालयात विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

सामाजिक बांधिलकी जपत वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना हातभार लावण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आदिनाथ पालवे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आणि मन लावून शिक्षण घेऊन उज्ज्वल भवितव्य घडविण्याचे आवाहन केले.या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष महादेवजी सोनवणे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू, शहरप्रमुख शिवाजी जावळे, माजी महानगरप्रमुख राधाचरण करतीया, उपशहरप्रमुख दशरथ चौधरी, अशोक जाधव, शाखाप्रमुख तानाजी माळी, युवासेना वॉर्ड अध्यक्ष दामू मिरगुडे, समाजसेवक शिवाजी रगडे, पत्रकार रामेश्वर गवई यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी आदिनाथ पालवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या समाजाभिमुख उपक्रमाचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी अशा प्रकारचे उपक्रम प्रेरणादायी असून समाजातील इतरांनीही अशा सामाजिक कार्यातून वाढदिवस साजरा करण्याचा आदर्श घ्यावा, असे मत अनेकांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचा समारोप विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण, मान्यवरांच्या शुभेच्छा आणि उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागाने आनंददायी वातावरणात झाला.





























