उल्हासनगर दि.१४ ( प्रमोद दळवी ) : गेल्या दोन दिवसापासून अतिउखाड्याने नागरिक हैराण झाले होते. उष्णतेची लाट पसरली असताना शनिवारी सायंकाळी अचानक मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे उल्हासनगर शहरातील काही रस्ते पाण्याखाली आले होते. उल्हासनगरातील कॅम्प नंबर ५ परिसरातील गणेश नगर सेक्शन ३९ ,संतोषी माता मंदिराकडे जाणारा नाल्यावरील जुना पूल कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. व्ही.टी.सी मैदान व कुर्ला कॅम्प नंबर ३ येथे जुने झाड कोसळले, अचानक आलेल्या मुसळधार पावसामध्ये उल्हासनगर शहरात कोणती जीवित हानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे

उल्हासनगरात सायंकाळी अचानक विजेच्या कडकडाटसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सर्व रस्ते निर्मनुष्य झाले होते. रस्त्याच्या किनारी असणारा नाल्या तुडुंब पाण्याने वाहून ते पाणी रस्त्यावर उतरले होते. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलेले चित्र शहरात पाहायला मिळत होते. शहरातील कॅम्प नंबर ४ परिसरातील सुभाष टेकडीतील आंबेडकर चौकात देखील रस्ता पाण्याखाली आला होता. त्यामुळे त्या ठिकाणाहून जाताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्याच दरम्यान रात्री सव्वा आठच्या सुमारास उल्हासनगरातील कॅम्प नंबर ५ परिसरातील गणेश नगर सेक्शन ३९ ,संतोषी माता मंदिराकडे जाणारा नाल्यावरील जुना पूल कोसळला. या नाल्यावरून परिसरातील लोक रहदारी करत होते. हा पुल तुटल्याने परिसरातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे. कॅम्प नंबर ५ परिसरातील शांती प्रकाश आश्रम रस्ता अंबरनाथ ते कल्याण रस्ता, डॉल्फिन क्लब रस्ता, गुलशन नगर रस्ता, गोल मैदान रस्ता, आधी रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते. या तुंबलेल्या पाण्यातूनच नागरिक आपले वाहने काढत होती.






























