मुरबाड दि.२ (सतिशचंद्र घरत) : गेल्या २९ ऑगस्ट पासून मुंबई आझाद मैदानात मराठा समाजाचे जोरदार उपोषण सुरु असून सरकारवर दबाव टाकून ओबीसी आरक्षणातून मराठ्यांचा सरसकट समावेश करून घेण्याची व ओबीसी प्रमाणपत्र देण्याची चुकीची मागणि होत आहे. असे झाल्यास हा ओबीसी समाजावर अन्याय होईल या अन्याय विरोधात ओबीसी समाज हि आक्रमक होताना दिसत आहे. समाजाच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालय मुरबाड येथे ४ सप्टेंबर २०२५ रोजी साखळी उपोषण व आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील विविध ओबीसी संघटनांच्यावतीने हे आंदोलन होणार असून, यावेळी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन सादर केले जाणार आहे.
या आंदोलनाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी तालुक्यातील सर्व ओबीसी समाजातील घटकांच्या प्रमुखांची बैठक एक सप्टेंबर रोजी कुणबी भवन येथे संपन्न झाली. यावेळी आंदोलनाचे नियोजन, साखळी उपोषणासाठी आवश्यक तयारी तसेच प्रशासनाशी संपर्क याबाबत चर्चा करण्यात आली असून साखळी उपोषणाचे निवेदन आज ओबीसी बांधवांच्या वतीने मुरबाड तहसीलदारांना देण्यात आले.
ओबीसी समाजातील सर्व संघटना, व समाजबांधव यांनी नियोजित आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सर्व ओबीसी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.आंदोलनाचे निवेदन देण्यासाठी मुरबाड तालुका कुणबी समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष गणपत विशे,राष्ट्रीय ओबीसी महासंघ ठाणे ग्रामीण अध्यक्ष प्रकाश पवार, उमेश पाटिल,ओबीसी उपोषणकर्ते शंकर वडवले, सोपान गोल्हे, नितीन राणे, यशवंत जाधव, पत्रकार श्याम राऊत उपस्थित होते.





























