- नुकसानग्रस्त विज ग्राहकांचे पंचनामे करून त्यांना तात्काळ शासकीय मदत उपलब्ध करून देण्याची मनसेची मागणी..
उल्हासनगर दि २४ : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी,उल्हासनगर – १ यांच्या कार्यक्षेत्रातील तानाजीनगर, हनुमान नगर परिसरात शनिवार दु.१२.३० ते १.०० च्या सुमारास विजेचा दाब वाढला आणि उच्च दाबामुळे वीज ग्राहकांच्या घरातील विजेवर चालणाऱ्या उपकरणांमध्ये शॉक सर्किट होऊन टीव्ही, फ्रीज, गिजर, पंखे, ट्यूब लाईट,एल ई डी दिवे,वाय- फाय राऊटर यांच्यात बिघाड झाला ते निकामी झाले.

तानाजीनगर, हनुमाननगर परिसरात हातावर पोट असणारे गोर-गरीब समाजघटक म्हणजे नाका कामगार, कंत्राटी कामगार, फळ विक्रेते, रिक्षाचालक वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो, बहुतेक रहिवाश्यांच्या घरातील विजेची उपकरणे ही कर्ज काढून हफ्त्यावर घेतलेली आहेत, काहींचे पुर्ण हफ्ते ही फीटलेले नाहीत परंतु विद्युत वितरण कंपनीच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे घरातील विद्युत उपकरणे निकामी झालेली असल्याने अगोदरच डोक्यावर कर्जाचा डोंगर आणि आता हे हजारोंचे नुकसान यामुळे तानाजीनगर,हनुमान नगर परिसरातील नागरिक हवालदिल झालेले आहेत.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे परिसरातील शेकडो वीज ग्राहकांचे हजारोंच्यावर नुकसान झालेले असल्याने विज वितरण कंपनी कडून अति-शिघ्रपणे सदर परिसरातील नुकसानग्रस्त वीज ग्राहकांच्या घरी जाऊन पंचनामे तयार करून त्यांना तत्काळ मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीकडे निवेदनाद्वारे केलेली आहे.
नुकसानभरपाईच्या कामात दिरंगाई झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीच्या निष्क्रिय कार्यपद्धती विरोधात गोर-गरिब वीज ग्राहकांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसावे लागेल असा इशाराही मनसे तर्फे देण्यात आलेला आहे. यावेळी मनसेचे मैनुद्दीन शेख, विभाग अध्यक्ष कैलास घोरपडे,कैलास वाघ,पांडुरंग गुंड आणि मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.





























