उल्हासनगर दि. ५ ( प्रमोद दळवी ) : आठ दिवसापूर्वी सामाजिक कार्यकर्त्या व वकील सरिता खानचंदानी यांनी रोमा अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी एका डायरीमध्ये सुसाइड नोट लिहून ठेवली होती. यावरून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण उल्हासनगर शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी उल्हासनगर, कल्याण, डोंबिवलीतील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ अधिकारी व पोलीस उपायुक्त गोरे यांना पोलिसांनी कुठल्याही दबावाला बळी न करता या गुन्हयाची फेर चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

त्यावेळी ठाकरे गटाचे दिपेश म्हात्रे यांनी सांगितले परिमंडळ – ४ चे डिसीपी गोरे यांना आज आम्ही एक निवेदन दिलेला आहे. की जो गुन्हा आमच्या जिल्हाप्रमुखांवर दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये पोलीस यंत्रणांनी कुठल्याही दबावाला बळी पडू नये. या केस मध्ये त्यांनी फेर चौकशी करावी आणि योग्य तो न्याय आम्हाला द्यावा आमचे विशिष्ट असे म्हणणं आहे की धनंजय बोडारे यांचा कुठलाही संपर्क त्या महिलेशी नसताना जाणून बुजून त्यांना या गुन्ह्यामध्ये सामील केले गेले आहे. आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे या गुन्ह्यात जे खरे आरोपी आहेत त्यांना शिक्षा द्या त्याला आमचा विरोध नाही. परंतु जे याच्यामध्ये निष्पाप आहेत त्यांना कुठेतरी या गुन्ह्यात सामील करण्याचे काम या केस मध्ये केले गेले ते कुठेतरी प्रशासनाकडून होऊ नये अशी आमची विनंती आहे त्यावेळी निवेदन देताना उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवलीतील ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .





























