उल्हासनगर दि. १९ ( प्रमोद दळवी ) : उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने उल्हासनगर व अंबरनाथ विधानसभा मतदारसंघांसाठी बी.एल.ए. (Booth Level Agent) प्रशिक्षण शिबिर तसेच जिल्हा काँग्रेसच्या नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा शुक्रवार, दि. १७ जुलै २०२६ रोजी कॅम्प क्रमांक ४ येथील शांती प्रकाश कम्युनिटी हॉलमध्ये मोठ्या उत्साहात आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला.

कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे राज्य प्रवक्ते हनुमंत पवार आणि ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष चेतनसिंह पवार हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. तर प्रदेश काँग्रेसच्या वतीने श्याम पाखरे यांनी बी.एल.ए.ची भूमिका, मतदार यादीची तपासणी, बूथ व्यवस्थापन, निवडणूक नियोजन आणि संघटनात्मक कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक बूथवर सक्षम यंत्रणा उभारण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. यावेळी पक्षाच्या वतीने उल्हासनगर शहरातील पाचही ब्लॉक अध्यक्षांना राज्य प्रवक्ते हनुमंत पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. त्यानुसार उल्हासनगर-१ ब्लॉक अध्यक्षपदी श्याम मडवी, उल्हासनगर-२ ब्लॉक अध्यक्षपदी विकी अहुजा, उल्हासनगर-३ ब्लॉक अध्यक्षपदी अनिल यादव, उल्हासनगर-४ ब्लॉक अध्यक्षपदी पवन मीराने आणि उल्हासनगर-५ ब्लॉक अध्यक्षपदी विशाल सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने बूथ स्तरावर पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला. नव्याने नियुक्त ब्लॉक अध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य आणि पक्षातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन काँग्रेसची संघटनात्मक ताकद अधिक वाढविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. राज्य प्रवक्ते हनुमंत पवार यांनी आपल्या भाषणात मतदार पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) संदर्भात भारतीय जनता पक्षावर टीका करत आगामी निवडणुकांच्या दृष्टीने काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याने सजग आणि संघटित राहण्याची गरज व्यक्त केली. त्यांनी पश्चिम बंगालमधील निवडणुकांचे उदाहरण देत बूथ स्तरावरील कामकाजाचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच केंद्र सरकारच्या विविध धोरणांवर भाष्य करत नोटाबंदी, बेरोजगारी, महागाई, पेपरफुटी, मतदार व्यवस्थापन तसेच इतर विविध मुद्द्यांवर सरकारवर टीका केली आणि जनतेचा विश्वास पुन्हा काँग्रेसकडे वळेल, असा विश्वास व्यक्त केला.
प्रशिक्षण शिबिरानंतर पक्षप्रवेशाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. यामध्ये निवृत्त शिक्षक राजेश कांबळे, श्रीनिवास गौरवर यांच्यासह अनेक नागरिकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून पक्षाची विचारधारा स्वीकारली. नव्याने पक्षात दाखल झालेल्या सदस्यांचे पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. या कार्यक्रमाला काँग्रेसच्या महानगरपालिका विरोधी पक्षनेत्या अंजलीताई साळवे, कुलदीप ऐलसिंघानी, किशोर धडके, सुनील बेहरानी, शंकर आहुजा, दीपक सोनवणे, मनीषा महाकाळे, सिंधू रामटेके, संतोष मुंडे, आबा साठे, सुधीर जाधव, दीपक तिवारी यांच्यासह जिल्हा व ब्लॉक स्तरावरील पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने काँग्रेस समर्थक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन जिल्हा काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमात आगामी निवडणुकांसाठी पक्ष संघटना मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून बूथ स्तरावरील संघटन वाढविणे, मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणे आणि पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करण्याचा संकल्प केला.





























