- पाण्याची हांडे डोक्यावर घेऊन महिला कार्यकर्त्यांचा पालिकेत शिरण्याचा प्रयत्न,
- पालिका प्रशासनाला सद्बुद्धी येण्यासाठी होम हवन
- सुरक्षारक्षक व पोलिसांबरोबर शिवसैनिकांची धक्काबुक्की
( प्रमोद दळवी )
उल्हासनगर दि. २ : शहरातील विविध नागरिक समस्या व पाणीटंचाईच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन उल्हासनगर महापालिकेवर शुक्रवारी जन आक्रोश मोर्चा काढला होता. संतप्त शिवसैनिकांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच होम हवन आंदोलन सुरू केले. त्यावेळी महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनी पालिकेच्या प्रवेशद्वाराचा गेट बंद केल्याने संताप शिवसैनिकांनी विशेषता महिला शिवसैनिक कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावर चढून पाण्याचा हंडा डोक्यावर घेऊन पालिकेत शिरण्याचा प्रयत्न केला. काही शिवसैनिक आत शिरल्यानंतर महापालिकेचे सुरक्षारक्षक, व पोलिसांबरोबर शिवसैनिकांची धक्काबुक्की झाली. शिवसैनिकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे महापालिकेच्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शहरातील नागरिकांच्या विविध समस्या त्वरित सोडवा, शहराला मुबलक पाणी मिळालाच पाहिजे, पाणीपट्टी दर कमी झालाच पाहिजे अशा विविध समस्या सोडवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. उल्हासनगर शहरांमध्ये पाणीटंचाई त्याचबरोबर अनियमित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक संताप झाले आहेत. हे पाणी समस्या सुटत नसल्याने ३० एप्रिल रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पालिकेला निवेदन दिले होते. त्या निवेदनात शहरातील विविध समस्या बाबत सांगण्यात आले होते. याशिवाय शुक्रवारी या समस्या बाबत शहरातील जनतेला सोबत घेऊन महापालिकेवर जन आक्रोश मोर्चा काढणार असल्याचाही इशारा देण्यात आला होता.

शुक्रवारी सकाळी ११ वाजताच मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी पालिकेच्या गेटवर गर्दी केली होती. शिवसेना महिला कार्यकर्त्यांनी डोक्यावर पाण्याचा हंडा घेत पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पालिकेवर आलेला हा जन आक्रोश मोर्चा पाहून पालिकेच्या सुरक्षारक्षकांची एकच तारांबळ उडाली होती. त्यांनी पालिकेचे प्रवेशद्वार बंद करताच संताप शिवसैनिकांनी प्रवेशद्वारावर चढून आत मध्ये शिरण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुरक्षा रक्षक व पोलीस यांच्यासोबत शिवसैनिकांची धक्काबुक्की झाली. पाणी समस्या सोडवण्यासाठी या जन आक्रोश आंदोलन मोर्चामुळे पालिकेच्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली होती. धनंजय बोराडे यांनी सांगितले की पाण्यासाठी हे जन आक्रोश आंदोलन वारंवार सांगून,व लेखी निवेदन देऊनही या महापालिका प्रशासनाला जाग येत नव्हती. पाण्याची समस्या सुटणे ऐवजी दिवसान दिवस वाढतच चालले आहे. काही भागात चार चार पाच पाच दिवस पाणी येत नाही.

अधिकाऱ्यांना फोन केला तर अधिकारी फोन उचलत नाही. या समस्याची दखल घेत नाही . आयुक्त मॅडम यांना वेळ नसतो. त्यांना या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्यांना प्रशासकीय कामकाजामुळे पुरेसा वेळ मिळत नाही. प्रशासकीय कामकाजामध्ये त्यांचा पहिला नंबर आला आहे. त्यांचे मी अभिनंदन करतो. पण पाण्याची समस्या,रस्त्यांची समस्या जशीच्या तशीच आहे. ही पाण्याची समस्या सुटण्यासाठी आज हा जन आक्रोश आंदोलन होतं या महापालिका प्रशासनाला व अधिकाऱ्यांना सद्बुद्धी मिळावी म्हणून या जनतेने आज होमहवन केले. आम्हाला खात्री आहे त्यांना सद्बुद्धी मिळेल असे धनंजय बोडारे म्हणाले .त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे, उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शाहू, भीमसेन मोरे, राधाचरण करोतिया, कुलविंदरसिंह बैस, उपविभाग प्रमुख प्रा. प्रकाश माळी सर, भाऊ मात्रे, दिलीप मिश्रा, सुरेश पाटील, राजन वेलकर, भगवान मोहिते, शिवाजी जावळे, दशरथ चौधरी, महेश फुंदे, आदिनाथ पालवे, प्रकाश चौधरी, महिला आघाडी शहर संघटक जया तेजी यांच्यासह शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी शिष्टमंडळासह पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत पाण्याच्या गंभीर समस्या बाबत बैठकीत चर्चा केली असता त्यावेळी अधिकाऱ्यांनी पाण्याची समस्या लवकरात लवकर आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन दिले.





























