अंबरनाथ दि. २४ ( प्रमोद दळवी ) : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तसेच कल्याण लोकसभेचे कार्यसम्राट, संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय दंडाधिकारी यांच्या दालनात ही बैठक पार पडली.

बैठकीत महाराष्ट्र शासनाने शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्यासंदर्भात जारी केलेल्या शासन निर्णयाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विशेषतः १ जानेवारी २०११ पर्यंत अस्तित्वात असलेल्या निवासी अतिक्रमणांचे नियमानुसार नियमितीकरण करण्याच्या प्रक्रियेवर भर देण्यात आला. यावेळी अतिक्रमण नियमित करण्यासाठी आवश्यक असलेली पात्रता, जागेची कमाल मर्यादा व आकारण्यात येणारे शुल्क, अर्ज स्वीकारण्याची व पडताळणीची प्रक्रिया, जागेची मोजणी करण्याची कार्यपद्धती तसेच अर्जाचे नमुने (फॉर्म) वाटप आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी संबंधित अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पात्र लाभार्थ्यांना न्याय मिळेल यासाठी समन्वयाने काम करण्याचे निर्देश दिले.

या बैठकीस उपनगराध्यक्ष सदाशिव पाटील, शिवसेना गटनेते रवींद्र कारंजुळे, नगरसेवक सुभाष साळुंके, कुणाल भोईर, स्वप्निल बागुल, सचिन पाटील, रोहित महाडिक, पूनम शेलार, माजी नगरसेवक संदीप लकडे, विभागप्रमुख सचिन गुडेकर, किसन गायकर, विनोद शेलार, सुधीर कन्हारे, शैलेश शिर्के, विकास कानडे, संजय जाधव, शिवाजीनगर रहिवासी संघाचे पदाधिकारी व रहिवासी तसेच संबंधित विभागातील अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीमुळे अंबरनाथ विधानसभा क्षेत्रातील शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याच्या प्रक्रियेला अधिक गती मिळणार असून, शासनाच्या निर्णयाचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी समन्वयाने कार्यरत राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.





























